नवी मुंबई : महाराष्ट्राचे वनमंत्री मंत्री नामदार गणेश नाईक यांनी सोमवारी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. पाणीटंचाई, रस्त्यांची दुर्दशा, अपूर्ण गटारकामे, अनियमित कचरा व्यवस्थापन अशा अनेक समस्या उपस्थित नागरिकांनी यावेळी मांडल्या.
दरबारात सादर झालेल्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देत नाईक यांनी महापालिकेचे संबंधित अधिकारी, पाणीपुरवठा विभाग, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश नाईक यांनी दिले.
जनता दरबारात मोठ्या ४०० नागरिक समस्या टोकन क्रमांक घेऊन उपस्थित होते. एका टोकन सोबत चार ते पाच त्यांचे सहकारी नागरिक असे दिड हजार नागरिक उपस्थित होते. काही प्रकरणांमध्ये नाईक यांनी थेट मोबाईलवर संबंधित अधिकाऱ्यांना त्तर मागितले. यामुळे उपस्थित जनतेमध्ये समाधान आणि प्रशासनावर विश्वास निर्माण झाला.
घणसोली, नवी मुंबई येथील सिडको मेघमल्हार सोसायटीला सिडकोकडून रिफंड मिळणारा कोट्यवधीचा देखभाल खर्च अद्याप मिळाला नसल्याबाबत सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष तुषार नाईक यांनी निवेदन दिले. गणेश नाईक यांनी सिडको अधिकाऱ्यांना या प्रकरणी चांगलेच धारेवर धरले.
जनतेचा हक्काचा फंड तुम्ही आत्तापर्यंत का दिला नाही. आता हा फंड लवकरात लवकर दिला नाही तर अधिकाऱ्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नाईक यांनी सिडको अधिकाऱ्यांना आपल्या शैलीत सांगितले. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. लोक मला प्रश्न विचारतात. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर थकित रक्कमेचा प्रश्न मार्गी लावा असे त्यांनी सांगितले.