Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रकोल्हापूरज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

पुणे, २० मे: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, वैज्ञानिक विचारवंत आणि मराठी विज्ञान साहित्यातील महत्त्वाचे लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी आज पहाटे झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉ. नारळीकर हे केवळ एक खगोलशास्त्रज्ञ नव्हते, तर विज्ञानाचे लोकप्रियकरण करणारे प्रभावशाली लेखकही होते. त्यांच्या रसाळ आणि सहज शैलीतील मराठी विज्ञानकथांनी नव्या पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते. त्यांनी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्यासोबत “हॉईल-नारळीकर सिद्धांत” मांडला, जो बिग बँग सिद्धांताच्या विरोधात होता.

१९ जुलै १९३८ रोजी कोल्हापुरात जन्मलेल्या डॉ. नारळीकर यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभागप्रमुख होते, तर आई सुमती नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. डॉ. नारळीकर यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर केंब्रिज विद्यापीठात जाऊन बी.ए., एम.ए., पीएच.डी. व रँग्लर ही पदवी प्राप्त केली. त्यांना टायसन मेडल, स्मिथ पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले होते.

भारत परतल्यानंतर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) कार्यभार स्वीकारला. नंतर ‘आयुका’ (IUCAA – Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी विज्ञान संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती.

डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय खगोलशास्त्रातील एक तेजस्वी युग संपुष्टात आले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा भावी वैज्ञानिकांना मार्गदर्शन करत राहील.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments