प्रतिनिधी : बेस्ट परिवहन सेवेची भाडेवाढ झाली असली तरी आम्हाला काही फरक पडत नाही. कारण रिक्षा टॅक्सी यांना विनंती करण्यापेक्षा बेस्ट सेवा आम्हाला कितीही भाडे वाढले तरी परवडणारी आहेच. अशी प्रतिक्रिया प्रवासी देत आहेत.
सात वर्षांनी भाडेवाढ झाली आहे. प्रवाशांना ती स्वीकारावीच लागेल. कारण बेस्ट जिवंत राहिली पाहिजे.शाळा कॉलेज अंध अपंग महिला सर्वच घटकाला पास सुविधा व आदराची भावना बेस्ट मधेच मिळते अशी प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील बस डेपो जवळ भर उन्हात बस ची वाट पाहणारे मारुती पवार या प्रवाशाने दिली.
भर उन्हात वातानुकूलित बस ने प्रवास करण्यासारखे सुख नाही.असे सुरेंद्र नाईक या प्रवाशाने सांगितले. तर बस स्थानकात सावली व रस्त्याकडेला असणाऱ्या स्टॉप वर बसण्याची योग्य सुविधा केली तर बरे होईल.असे देविदास साळुंखे यांनी सांगितले. आता गुगल मॅपवर बसचे नेमके ठिकाण कुठे आहे हे कळणार आहे. अत्याधुनिक काळात बेस्ट पण आपले रुपडे ” बेस्ट ” करत आहे याचा आनंद आहे. असे एका प्रवाशाने प्रतिक्रिया देताना सांगितले.
सार्वजनिक वाहतूक सेवेतील एक बेस्ट सेवा अजून चांगली देण्यासाठी प्रवाशांनी महागाईच्या काळात बेस्ट वाचविण्यासाठी भाडेवाढीस सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे एका वाहकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. शालेय विद्यार्थ्यांना या भाडेवाढीचा काही परिणाम होणार नाही असे बेस्ट ने जाहीर केल्यामुळे विद्यार्थी वर्ग आनंदी आहे. पाच रुपये किमान भाडे होते तेव्हा प्रवासी वाढले होते मात्र बेस्ट चा महसूल कमी झाला होता. आता भाडेवाढ आहे. येणारा काळच ठरवेल बेस्ट चे भवितव्य.