मुंबई : आपला वाढदिवस कोणत्याही वैयक्तिक उत्साहासह किंवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत न साजरा करता, आमदार प्रसाद लाड यांनी एक अत्यंत प्रेरणादायी आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांनी प्राण गमावले. या दुर्दैवी घटनेमुळे व्यथित झालेल्या प्रसाद लाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’स १५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ निरपराध नागरिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ही हृदयविदारक घटना मनाला चटका लावून गेली. त्यांच्या कुटुंबियांच्या अश्रूं मध्ये आणि वेदनेत सहभागी होण्यासाठी, स्वतःचा वाढदिवस साजरा न करता, ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’स रु. १५ लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून त्यांनी विनंती केली आहे की, शहीद (त्यांनी या मृत नागरिकांना ‘शहीद’ असेच संबोधले आहे) झालेल्या ६ नागरिकांच्या कुटुंबियांना या निधीतून प्रत्येकी २.५० लाख रुपयांची मदत दिली जावी. आमदार प्रसाद लाड यांनी मदतीचा हा धनादेश सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
“या शहीदांच्या त्यागाला वंदन करीत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्याचा हा माझा नम्र प्रयत्न आहे,” अशी भावना त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे आज त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंना दिलासा मिळावा, ही इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
आमदार प्रसाद लाड यांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता समस्त महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कृतीमुळे वाढदिवसाचे खरे मोल आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे अनोखे उदाहरण समोर आले आहे.
याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री दादाजी भुसे, मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.