तळमावले (विजया माने) : तळमावले येथील कविता कचरे यांची भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL), सातारा यांच्या टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. बीएसएनएलचे माळी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या निवडीबाबत कविता कचरे यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मन:पूर्वक आभार मानले. “मी कोणतीही मागणी न करता मला या महत्त्वाच्या जिल्हास्तरीय समितीवर संधी दिल्याबद्दल मी ऋणी आहे. माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन,” असे त्यांनी सांगितले.
कचरे यांनी बीएसएनएल शी संबंधित नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. “नेटवर्क समस्या, टॉवर विषयक तक्रारी, सेवा-सुविधां मधील त्रुटी याबाबत मी वेळोवेळी खासदार साहेबांच्या निदर्शनास आणून देत सुधारणा घडवून आणेन,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या समितीत निवड झालेल्या पहिल्या महिला सदस्य म्हणून संधी मिळाल्याचा विशेष अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले. “ही संधी माझ्यासाठी गौरवाची असून, मी ती संधी संधीसदृश्य मानून प्रामाणिक कामगिरी करेन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नियुक्तीपत्र देताना लता पुजारी, सुप्रिया पाटील, रेश्मा घाडगे यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते. शेवटी कविता कचरे यांनी संयोजक सुनील काटकर, लोकसभा सातारा तसेच भाजप परिवार सातारा यांचेही आभार मानले.