मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा,तसेच दादर रेल्वे स्थानकाचे चैत्यभूमी असे नामकरण करावे, अशा मागण्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केल्या आहेत.
रेल्वे विषयक विविध प्रश्नांसंदर्भात मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळ रेल्वे समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर माहिती देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यासंदर्भात सरकारकडे यापूर्वीही मागणी केली आहे. सर्व स्तरांवर पत्रव्यवहारदेखील झाला आहे, पण ती अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. शासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा ही मागणी आज केली. या मागणीला उपस्थित इतर पक्षांच्या खासदारांनीही सहमती दर्शवली. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दादरचे जवळचे नाते पाहता, दादर रेल्वे स्थानकाला त्यांचा वारसा दर्शवणारे नाव देणे नक्कीच योग्य ठरेल, हे मी याआधीही लोकसभेतही मांडले आहे. आज या मागणीचा पुनरुच्चार केला आणि सरकारने येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात नामांतराचा प्रस्ताव मांडून डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांच्या भावनांचा आदर करावा, अशी मागणी केली आहे.
३० जानेवारी रोजी सेंट्रल रेल्वेच्या DRM यांची भेट घेऊन, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी तातडीच्या मागण्या मांडल्या होत्या. दुर्दैवाने, त्यातील एकही मागणी पूर्ण झालेली नाही. यासंबंधीचे कोणतेही अपडेट दिले गेले नाहीत. अगदी सौजन्याने उत्तरही दिले गेले नाही. आजच्या बैठकीत यावर तीव्र नापसंती व्यक्त केली. सत्ताधारी पक्षातील काही खासदारांनीही असेच अनुभव बोलून दाखवले असे खासदार गायकवाड म्हणाल्या.
रेल्वे संदर्भातील महत्त्वाच्या प्रलंबित मागण्या: सायन रेल्वे पूलचे काम फारच संथ गतीने सुरु आहे. स्थानिक नागरिक, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला रोज जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. या कामाला गती आणणे आवश्यक आहे. उपनगरी रेल्वेमार्गावर अपघातामुळे दररोज ७ लोक मृत्युमुखी पडतात हे अक्षम्य आहे. रेल्वेने ‘झिरो ॲक्सिडेंट पॉलिसी’ लागू करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांची अमलात आणावे. प्रत्येक स्थानकावर २४x७ आपत्कालीन अॅम्ब्युलन्स हवी. सबळे नगर, कुर्ला (पू.): रेल्वेच्या जागेवरील रिकाम्या, जीर्ण आणि धोकादायक इमारती तातडीने पाडाव्यात. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवासी सुविधांमध्ये तातडीने सुधार करा, सुरक्षित आणि सुलभ पिण्याच्या पाण्याची सोय करावी, कायमस्वरूपी रिक्षा व टॅक्सी स्टँड उभारावे. स्टेशनवर अधिक स्वच्छतागृहे असण्याची गरज आहे. कुर्ला (पू.) रेल्वे आरक्षण केंद्र: ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी प्राधान्य काउंटर सुरू करावे. रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्टी धारकांचे तातडीने पुनर्वसन करावे. कुर्ला येथील क्रांती नगरच्या पुनर्विकासाला प्राधान्य द्यावे. जी.टी.बी. नगर आणि सायन कोळीवाडा पूल त्वरित लोखंडी सुरक्षा बॅरियर्स बसवावे. कुर्ला (पू.) कुरेशी नगर येथील पादचारी पूल तातडीने बांधावा अशा मागण्यात करण्यात आल्याचे खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
*खा. वर्षा गायकवाड यांनी घेतली आर्चबिशप यांची भेट*.
खा. वर्षा गायकवाड यांनी आर्चबिशप जॉन रॉड्रिग्ज यांची भेट घेऊन पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहिली. तसेच आर्चबिशपसोबत श्रद्धा, जीवन आणि नागरिकांवर परिणाम करणाऱ्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी मुंबईकर आणि जगासाठी शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. खा. गायकवाड यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आसिफ झकेरिया, करेन डिमेलो व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस उपस्थित होते.