प्रतिनिधी : मुंबईच्या पूर्व-पश्चिम भागांना जोडणारा आणि वाहतूक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा एल्फिन्स्टन पूल काहीच वेळात वाहतुकीसाठी बंद होणार आहे. शिवडी-वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचा भाग असलेल्या या पूलाचे दुहेरी स्तरावर उन्नतीकरण होणे आवश्यक असल्याबाबत कोणतीही शंका नाही.
पण एमएमआरडीएने हे काम काटेकोर नियोजनाने व अंमलबजावणीसह करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासन व पोलीस यांच्याशी उत्तम समन्वय साधणे आणि वेळेत काम पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
सायन पूल बंद झाल्यानंतर तब्बल आठ महिने उलटून गेले तरी अजूनही पुलाचे पाडकाम सुरू झालेले नाही. त्यामुळे शासनाच्या गैरनियोजनाचा फटका सामान्य मुंबईकरांना बसतो आहे.
याशिवाय, टिळक ब्रिज व इतर मार्गांवरही रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यानंतर पूर्व-पश्चिम वाहतुकीवर गंभीर परिणाम होणार, हे निश्चित आहे.
या पार्श्वभूमीवर, पर्यायी मार्गांबाबत स्पष्ट फलक लावणे, प्रवाशांचे योग्य व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांची नेमणूक, आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित सुविधा पुरवणे – ही सर्व बाबतीत तत्काळ पावले उचलावी, अशी मागणी खासदार वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.