प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या सुरू असलेली रस्ते, गटारे, पदपथ, मलनि:स्सारण वाहिन्या, कल्व्हर्ट यांची कामे 15 मे पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश देतानाच महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून पावसाळी कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही याची काळजी घेण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी करावी असे स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहर आपत्ती व्यवस्थापन समितीची नियोजन बैठक पार पडली. याप्रसंगी समितीचे सचिव तथा अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, आपत्ती व्यवस्थापन उपआयुक्त श्रीम.ललिता बाबर आणि इतर नमुंमपा विभागप्रमुख, सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता तसेच वाहतुक पोलीस उपआयुक्त श्री. तिरूपती काकडे, पोलीस उपआयुक्त विशेष शाखा श्रीम.रश्मी नांदेडकर, ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, पीडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता श्रीम.कल्याणी गुप्ता, एपीएमसी सहसचिव डॉ.महेश साळुंकेपाटील तसेच सिडको, एमआयडीसी, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नवी मुंबई पोलीस व वाहतुक पोलीस, औद्योगिक सुरक्षा विभाग, एपीएमसी, एमपीसीबी, रेल्वे, बेस्ट, महावितरण व महापारेषण, एपीएमसी, आरएएफ, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, महानगर गॅस लिमी., टीबीआयए, स्मॉल स्केल इंड.असो., एमटीएनएल, एअरटेल-रिलायन्स मोबाईल सेवा, मच्छीमार संघटना आदी विविध प्राधिकरण, संस्था यांचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आयुक्तांनी आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने त्याआधी करावयाचा अत्यावश्यक कामांचा बाबनिहाय सविस्तर आढावा घेतला व याविषयीची कार्यवाही तातडीने करावी असे निर्देशित केले. यामध्ये विशेषत्वाने पावसाळ्याआधी करण्यात येणारी नालेसफाई व मोठ्या गटारांची सफाई तत्परतेने सुरू करावी व नियोजित वेळेत पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले. यामध्ये सफाई करताना नाले व गटारे यांच्या काठावर काढून ठेवला जाणारा गाळ सुकल्यानंतर एक ते दोन दिवसातच उचलला जावा याची काटेकोर काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
महानगरपालिकेच्या क्षेत्रात एमआयडीसी भागात मोठया प्रमाणावर रस्ते व इतर कामे सुरु असून ती कामे जलद पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच दरड कोसळण्याच्या संभाव्य जागांची महानगरपालिका व एमआयडीसी यांच्या क्षेत्रीय अधिका-यांनी संयुक्त पहाणी करावी आणि त्या परिसरात नागरिकांचे वास्तव्य असल्यास त्यांना दरड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात आणून देऊन त्यांचे तत्परतेने स्थलांतरण करावे असे आयुक्तांनी सूचित केले. विशेषत्वाने दिघा इलठणपाडा धरणाच्या खाली असणा-या झोपड्यांच्या स्थलांतरणविषयक आवश्यक कार्यवाही करावी तसेच नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात असलेल्या झोपडपट्टया स्थलांतरणाबाबतही कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्यंतिक गरजेशिवाय कोणत्याही नवीन खोदकामाची परवानगी देण्यात येऊ नये असे दोन्ही परिमंडळ उपआयुक्तांना सूचित करतानाच दिलेल्या परवानग्यांची कामे 15 मे पर्यंत पूर्ण करुन ते खोदकाम व्यवस्थितरित्या पूर्ववत केले जाईल याची दक्षता घ्यावी असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
पावसाळी कालावधीपूर्वी धोकादायक झाडे व झाडांच्या फांदयांची गरजेएवढी छाटणी करण्याबाबत कार्यवाही सुरु करावी व पावसाळी कालावधीत जोरदार वा-यामुळे पडणा-या फांद्या लगेच उचलण्याबाबतच्या कार्यवाहीचे विभागवार नियोजन करावे असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
धोकादायक इमारती हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याचे लक्षात घेत धोकादायक इमारतीत राहणा-या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या स्थलांतराबाबत आवश्यक कार्यवाही सुरू करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. यामध्ये विशेषत्वाने गावठाण भागातील इमारतींच्या स्थितीचीही पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले. बांधकाम साईट्सवर धूळ नियंत्रण व पावसाळी कालावधीत अपघात होऊ नये तसेच त्याठिकाणी डास उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ नयेत यादृष्टीने संबंधितांना पूर्वसूचना देण्याचे व खबरदारी घेण्याचे निर्देशित करण्यात आले.
मागील वर्षी घाटकोपर येथील होर्डींग कोसळल्याने झालेली दुर्घटना लक्षात घेता महानगरपालिकेसह सिडको, रेल्वे, पीडब्ल्यूडी व इतर प्राधिकरणांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे व अनधिकृत होर्डींग हटविण्याची कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शहरातील मुख्य व मध्यवर्ती सायन पनवेल महामार्ग असल्याने तो खड्डेमुक्त व सुस्थितीत रहावा या दृष्टीने संपूर्ण काळजी घ्यावी तसेच वाहतूक पोलीसांच्या सहयोगाने वाहतूकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही आणि प्रामुख्याने पावसाळ्यात रहदारीला अडचण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले..
अशाच प्रकारे एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या काटई रस्त्याच्या कामांमुळे सेक्टर 3 ऐरोली येथील नाल्याच्या प्रवाहाला अडथळा होणार नाही यासाठी आवश्यक दक्षता घेणेबाबत तसेच काही ठिकाणी खराब झालेला रस्त्यांची पावसाळापूर्व तातडीने दुरूस्ती करावी असेही निर्देश देण्यात आले.
महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीची दरवाजे तुटलेली सबस्टेशन, डीपी बॉक्स, उघडया केबल यांची दुरुस्ती तत्परतेने करण्याचे सूचित करतानाच आयुक्तांनी मोठया ट्रान्सफॉर्मरच्या आसपास असणारी अस्वच्छता दूर करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित केले.
महानगर गॅस लिमीटेडनेही आवश्यक ती खबरदारी घेऊन पावसाळी कालावधीत विशेष खबरदारी घ्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
यावेळी वाहतूक पोलीस उपआयुक्त श्री.तिरूपती काकडे यांनी शहरातील विविध भागांमध्ये पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे असलेल्या कामांची माहिती दिली. याबाबत आयुक्तांनी संबंधितांना आदेश देऊन ही कामे प्राधान्याने हाती घेण्याचे व विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
पावसाळी कालावधीत मोठया भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास पाणी साचण्याच्या संभाव्य जागांवर पुरेशा प्रणाणात पम्पींग मशीन व मनुष्यबळ कार्यांन्वित राहील याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले. सर्व पावसाळापूर्व कामांचा स्वत: पहाणी करुन आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सिडको व रेल्वे प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने रेल्वे स्टेशन्समधील आवश्यक कामे पूर्ण करावीत, विशेषत्वाने रेल्वे स्टेशनमधील शौचालयांच्या दुरूस्तीवर व तेथील नियमित स्वच्छतेवर लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे रूळांना समांतर जाणा-या व काही ठिकाणी रेल्वे रूळांखालून जाणा-या नाले सफाईकडे काटेकोर लक्ष देण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. एपीएमसी मार्केट हा शहरातील एक महत्वाचा आणि कायम वर्दळीचा भाग असून येथील अंतर्गत स्वच्छतेबाबत संबंधित प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी व अंतर्गत नालेसफाई आणि विशेषत्वाने पावसाळी कालावधीतही स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात आले.
पावसाळा कालावधीत महानगरपालिका मुख्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाप्रमाणेच विभागीय नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन केंद्रातील कक्ष हे आवश्यक मनुष्यबळासह व यंत्रसामुग्रीसह 24 X 7 सुसज्ज राहतील यादृष्टीने नियोजन करावे व त्याची कार्यवाही सुरू करावी असेही निर्देशित करण्यात आले. इतरही प्राधिकरणांनी आपले नियंत्रण कक्ष सुरू करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले.
आठही विभाग कार्यालय स्तरावर आपत्तीकाळात नागरिकांना तात्पुरत्या निवा-यासाठी जागा निश्चित करण्याची कार्यवाही करावी व त्याठिकाणी अन्नपदार्थांसह गरजेच्या वस्तू उपलब्ध राहतील याचे आत्तापासूनच नियोजन करावे असेही सूचित करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाचा कृती आराखडा प्रसिध्द करण्यात येतो. त्यासाठी सर्व प्राधिकरणांनी आवश्यक माहिती व संपर्कध्वनी क्रमांक आठवडाभराच्या कालावधीत उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना देण्यात आल्या.
पावसाळी कालावधीतील साथरोग नियंत्रणासाठी तसेच मलेरिया व डेंग्यूसारख्या संभाव्य आजारांबाबत आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला करण्यात आला. त्याचप्रमाणे जलजन्य आजार नियंत्रणासाठी उपाययोजना करणे व पुरेसा औषधसाठा करुन ठेवणे याविषयी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे या कालावधीत पाण्याच्या शुध्दतेकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देशित करीत पाणीनमुने संख्येमध्ये वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शालेय विभाग तसेच परिवहन सेवा यांनाही आवश्यत दक्षता घेण्याच्या व तत्पर कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.
पावसाळी कालावधीत रॅपीड ॲक्शन फोर्स, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, मच्छिमार संघटना यांची मोठया प्रमाणावर मदत होते. त्यांच्या प्रतिनिधींनाही मदतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.
आपत्ती येऊच नये यादृष्टीने खबरदारी घेणे व आपत्ती आलीच तर त्यामध्ये फार हानी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने पूर्वनियोजन आवश्यक असून शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत चर्चेअंती ठरलेल्या बाबींची अंलबजावणी संबंधित प्राधिकरणांनी गांभीर्याने करावी असे सूचित करीत महापालिका आयुक्त तथा नवी मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास शिंदे यांनी 15 मे पर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण करावीत असे निर्देश दिले व आपण स्वत: पहाणी करणार असल्याचे स्पष्ट केले.