Wednesday, June 25, 2025
घरमहाराष्ट्र...नाहीतर जनसुरक्षा कायद्या विरोधात रस्त्यावर उतरू, आमदार सचिन‌ अहिर‌ यांचा इशारा

…नाहीतर जनसुरक्षा कायद्या विरोधात रस्त्यावर उतरू, आमदार सचिन‌ अहिर‌ यांचा इशारा

मुंबई : जनसुरक्षा कायद्या‌ला विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आम्ही विरोधी पक्षाचे आमदार कसुन विरोध करू, तरीही राज्य सरकारने हा कायदा लादला तर त्या विरूद्ध कामगार संघटना, राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था एकत्रित रस्त्यावर उतरून प्रखर आवाज उडवतील,असा सज्जड इशारा भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आमदार सचिन भाऊ अहिर यांनी येथे जन सुरक्षा कायद्या विरोधात वांद्रे येथील जिल्हाध्यक्ष कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या,निषेध आंदोलनात बोलताना दिला आहे.
लोकशाही विरोधातील जन सुरक्षा कायदा रद्द करा आणि कामगार विरोधी फोर कोड बिल मागे घ्या, या मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगार संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षही सामील झाले होते.
त्या वेळी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटिच्या अध्यक्षा‌ खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेची पायमल्ली करणारे हे जनसुरक्षा विधेयक असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,जनता गोरगरिबांच्या भाषण स्वातंत्र्या वर एवढेच काय पण पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्या-या या कायद्याला विरोध करावाच लागेल.
सीपीएम नेते प्रकाश रेड्डी म्हणाले,कार्पोरेट धार्जिणे फडणवीस सरकार कामगार विरोधी कायदे आणून कामगार वर्गाला नेस्तनाबूत करू पाहत आहे.शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव म्हणाल्या,भाषावाद, जातीयवाद निर्माण करणारे हे सरकार जनसुरक्षा कायदा आणत आहे. तेव्हा यांचे डोके ठिकाणावर येईपर्यंत हे‌ आंदोलन चालू राहील.
आमदार सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.येत्या वीस मे रोजी जन सुरक्षा कायदा आणि चार श्रम संहिते विरोधी जो‌ कामगार संघटनांनी भारत बंदचा नारा दिला आहे, त्याची आठवण करून देऊन कामगार विरोधी सरकारचा आपल्या भाषणात निषेध केला आहे.
आजच्या आंदोलनात कॉंग्रेस,उबाठा,शरद पवार राष्ट्रवादी या राजकीय पक्षांसह आयटक,इंटक, सीटू, एआयसीसीटीयु,टीयुसीआय,
सर्व श्रमिक संघटना, बुक्टू, भारतीय महिला फेडरेशन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना,महिला सभा, अत्याचारी विरोधी मंच, एआयवायएफ, पुरोगामी युवक संघटना, एआयएसएफ, एसएफआय,पुरोगामी विद्यार्थी संघटना,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लाल निशान पक्ष,समाजवादी पक्ष, कामगार संघटना आणि सामाजिक संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
‌‌ महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात जनसुरक्षा विधेयक रद्द करा आणि चार श्रम संहिता मागे घ्या,या मागण्यांसाठी कामगार संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन,झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करीत आहेत,असे कॉ.प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments