कराड (विजया माने) – समतेचा विचार समाजमनात खोलवर रुजवणारे महात्मा जोतिबा फुले हे खर्या अर्थाने शिक्षण, सत्य आणि समतेसाठी लढणारे क्रांतिसूर्य होते. शूद्र, अतिशूद्र व स्त्रियांना शिक्षण आणि न्याय मिळावा यासाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले, असे प्रतिपादन यशदा चे प्रवीण प्रशिक्षक शरद गाडे यांनी केले.
पंचायत समिती, कराड येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात दत्तात्रय दुपटे व महेंद्र कांबळे यांनी प्रभावी क्रांतिकारी गीत सादर केली. त्यांच्या सादरीकरणातून सामाजिक समतेचा संदेश ठळकपणे अधोरेखित झाला.
या वेळी कक्ष अधिकारी मारुती संकपाळ, अधीक्षक दीपक कराळे, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) सागर बोलके आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे आयोजन सुसुत्र पद्धतीने पार पडले.
महात्मा फुले यांचे विचार आजही तितकेच काळसुसंगत आहेत. समाजात समानता, शिक्षण आणि बंधुतेचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी अशा कार्यक्रमांची नितांत गरज आहे, असे मत अनेकांनी यावेळी व्यक्त केले.