मुबई : स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी तसेच राष्ट्रीय सण उत्सवाच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक इमारतीवर विद्युत रोषणाई केली जाते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा एक राष्ट्रीय सणच आहे. या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करावी अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पाठवलेल्या पत्रात खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी पुढे असे म्हटले आहे की, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती असते. बाबासाहेब यांची जयंती हा सुद्धा एक राष्ट्रीय उत्सवच असून १३ एप्रिल व १४ एप्रिल २०२५ रोजी महानगरपालिका इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, असे या पत्रात म्हटले आहे.