सातारा
(अजित जगताप) : राष्ट्रीय एकात्मता व बंधुभाव ही भावना निर्माण करण्यासाठी सातारकरांच्या अनेक पिढ्यांनी प्रयत्न केले. आजही साताऱ्यात एकात्मतेचे रंग ईद मुबारकाने बरसल्याचे चित्र संपूर्ण सातारा जिल्ह्यात पाहण्यास मिळाले आहे.
सातारा हे सेवानिवृत्ती लोकांचे गाव अशी ओळख होती. आता जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. ही आनंदाची बाब आहे.
सातारा शहरातील विविध रंगाच्या कंपनीच्या सहकार्याने उद्योग व्यवसायामध्ये योगदान देणारे राठी व मणेर कुटुंबीयांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा अनोखा विक्रम केलेला आहे. हिंदू- मुस्लिम- शीख- ईसाई… सब है अपने भाई भाई… या संदेशाची ज्योत तेवीत ठेवली आहे.
सातारा शहरातील सोमवार पेठेत हिंदू बांधवांच्या घरात ईद आणि मुस्लिम बांधवांच्या मंजिल मध्ये गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा दहा वर्षापासून सुरू झालेली आहे. उद्योजक श्री सुनील राठी , सौ उषादेवी राठी आणि उद्योजक अझरभाई मणेर व मणेर कुटुंबियातील सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष बाब म्हणजे विविध रंगाच्या कंपनीचे विक्रेते म्हणून उदय पेंट्स च्या माध्यमातून हे दोन्ही धर्माचे लोक एकत्र येऊन व्यवसायामध्ये रंगाच्या शिवधनुष्यांसारखे माणुसकीचे इंद्रधनु निर्माण करत आहे. त्यामुळे कौटुंबिक चार चांद लागलेले आहेत.
हिंदूंचा सण गुढीपाडवा व मुस्लिम समाजाची ईद एकत्रित साजरी करण्यात आली. सातारा शहरातील मुस्लिम समाजातील असलम भाई, जावेदभाई, जुबेरभाई, सद्दाम भाई, शरीफभाई, सादभाई ,फिरोजभाई ,जहांगीरभाई ,आदिल भाई अशा अनेकांनी साताऱ्यातील बुधवार नाक्यावरील ईदगाह मैदानावर जाऊन सामुदायिक रित्या नमाज अदा केली. त्यानंतर राठी निवासस्थानी जाऊन त्यांनी उद्योजक व हौशी गायक श्री सुनील राठी यांची भेट घेऊन एकमेकांना मनापासून शुभेच्छा दिल्या. तसेच शीरखुर्माचा आस्वाद घेतला.
जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी छत्रपतींची राजधानी असलेल्या साताऱ्यातील छत्रपती घराण्याचे खूप मोठे योगदान आहे. आज सुदैवाने लोकशाहीमध्ये श्रीमंत छत्रपती खा .उदयनराजे भोसले व आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दिल्ली व महाराष्ट्रात सातारचे प्रतिनिधित्व करत आहे. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या या दोन नेत्यांनी विकास कामे करताना सर्व जातीधर्माचा विचार केला आहे.
नुकत्याच विधिमंडळाच्या अधिवेशनात मंत्री महोदय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुस्लिम प्रार्थना स्थळ व कब्रस्तान विकासासाठी निधी उपलब्ध केला आहे. यानिमित्त त्यांनाही मुस्लिम बांधवांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी उद्योजक श्री सुनील राठी, सौ उषादेवी राठी, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अझरभाई मणेर, अजित जगताप, शेखर कडव, डॅनियल खुडे यांच्यासह विविध जाती धर्मातील लोकांनी गुढीपाडवा व ईद निमित्त मनापासून एकमेकांना शुभेच्छा देऊन सातारा नगरीच्या मानवता भावनेचे कौतुक केले आहे. साताऱ्यात एकात्मतेच्या रंगाने ईद मुबारक बरसल्याने कडक उन्हाळ्यातही मनाला गारवा मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. आज मुस्लिम बांधवांच्या घरी सर्व जाती धर्माच्या लोकांनी शीरखुर्माचा आस्वाद घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
—————————————
फोटो – साताऱ्यातील गुढीपाडवा व ईद निमित्त एकमेकांना शुभेच्छा देताना सर्वधर्मीय बांधव (छाया- निनाद जगताप, सातारा)