सातारा(अजित जगताप) : हिंदू सणाच्या तिथीनुसार मराठी महिन्याची सुरुवात यावर्षी ३० मार्च रोजी म्हणजे चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या सणाने झाली. पहिला दिवस आपण नववर्ष आणि गुढी उभारून साजरा करतो. विशेष म्हणजे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याला साखरेच्या गाठीचे विशेष महत्त्व असल्याने साखरेच्या गाठी बनविण्यासाठी एक महिना अगोदर सुरुवात होते. अलीकडे मधुमेहाचे प्रमाण वाढीस लागल्यामुळे सध्या साखरगाठी खरेदीची घट झाल्याचे दिसून येत आहे .
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हिंदू बांधव व भगिनी घरोघरी गुढ्या उभारतात. एका उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी बांधतात. त्यावर चांदीचा गडू उपडा ठेवून, कडुनिंबाची डहाळी व आंब्याची पाने त्यावर बांधतात. रंगबेरंगी साखरेची गाठी व फुलांचा हार गुढीला चढवतात. घरासमोर उंच ठिकाणी गुढी उभारली जाते. साखरेच्या गाठी व कडुनिंबाच्या पानाशिवाय गुढी उभारली जाऊच शकत नाही. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात साखरगाठी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत होती. बाजारांतून आकर्षक नक्षीकाम, वेगवेगळे रंग, रेखीव आकार, वेगवेगळी चित्रे असलेल्या गाठीची खरेदी केली जात होती. अलीकडच्या धावपळीच्या जीवनामध्ये एकत्र कुटुंब पद्धत नष्ट झाल्यामुळे व जागेचा प्रॉब्लेम तसेच अनेकांना मधुमेह असल्यामुळे साखरगाठीची चव बघणे दुरापास्त झाले आहे.मधुमेह हा प्रामुख्याने अनुवांशिक आणि पर्यावरणातील घटकांवर अवलंबून असतो. पण आरोग्यदायी आहार आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवू शकता.प्रक्रिया केलेल्या साखरेचे पेय किंवा पदार्थ टाळून आणि पास्ता किंवा व्हाईट ब्रेड ऐवजी धान्य किंवा व्होलमीलचा वापर करणं हे त्यासाठीचं पहिलं आणि चांगलं पाऊल ठरू शकतं.
रिफाइन्ड साखर किंवा रिफाइन्ड धान्यातील पोषक तत्वे कमी असतात. कारण त्यातील तंतूमय किंवा जीवनसत्वं असलेला भाग काढून टाकला जातो. साखरयुक्त पेये, मिठाई आणि साखर घातलेले पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांना त्रासदायक ठरतात. असे वैद्यकीय अधिकारी सांगतात .त्यामुळे सणाची गोडी निर्माण करणाऱ्या साखरगाठी खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही सणासुदीला साखरगाठीचे महत्व कमी होऊ शकत नाही. परंतु मधुमेहाच्या भीतीने आता ठराविक ग्राहक साखर गाठी खरेदी करत असल्याचे दिसून आले आहे.
साखरे ऐवजी गुळाचा चहा सध्या लोकप्रियता मिळवत असताना आता गुढीपाडव्याला गुळगाठी बाजारात निघाल्यास नवल वाटणार नाही. सध्या हॉटेलमध्ये पुरणपोळी सुद्धा विकत मिळत आहे. अशी स्थिती निर्माण झालेली आहे. अशी माहिती वरद हॉटेलचे मालक सतीश जाधव व उद्योजक अजित निकम यांनी सांगितले.
—————————————————-
फोटो – गुढीपाडव्यानिमित्त साखरगाठी निर्माण करताना कारागीर