प्रतिनिधी(प्रताप भणगे) : सातारा जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकारने देशातील गरजू आणि गरीब नागरिकांसाठी स्वस्त धान्य देखील देण्याची योजना चालू केलेली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी करणे देखील बंधनकारक केले असून यासाठीची मुदत वेळोवेळी वाढवून दिलेली आहे. मात्र, आता ज्या कार्डधारकांनी ई-केवायसी केलेली नाही, अशांना १५ मार्चनंतर रेशन मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांनी ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक वितरण विभागाच्या वतीने गोरगरिबांना स्वस्त धान्याचा लाभ दिला जातो. मात्र, शासकीय कर्मचारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असेल आणि ते निदर्शनास आले तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात १७ लाख ६१ हजार ५७२ रेशनकार्डधारक असून आतापर्यंत १२ लाख ७७ हजार ०४७ कार्डधारकांनी ‘केवायसी’ पूर्ण केली आहे.