मुंबई : स्वराज्याचा मानबिंदू असलेल्या छत्रपती संभाजीराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अहिल्यानगर येथील धर्मवीर गडाचा शासनाच्या वतीने जीर्णोद्धार करावा, अशी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात राहुल शेवाळे यांनी धर्मवीर गडाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करून गडावरील सद्यस्थितीची माहिती दिली आहे.
आपल्या निवेदनात माजी खासदार राहुल शेवाळे यांनी लिहिले आहे की, स्वराज्य रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या छत्रपती संभाजीराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील पेडगाव येथील धर्मवीर गड हा एक अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. क्रूरकर्मा औरंगजेबाच्या आदेशाने सलग 29 दिवस इथेच संभाजी राजेंवर अमानुष अत्याचार करण्यात आला होता. मुघलांच्या अत्याचाराने ही वास्तू हादरली, मात्र छत्रपती संभाजीराजे यांनी अखेरपर्यंत हार मानली नाही. छत्रपतींच्या पराक्रमाचा मूक साक्षीदार असलेल्या हा धर्मवीर गड सध्या जीर्णावस्थेत असून, गडावरील अनेक पुरातन वास्तू आणि मंदिरे यांची पडझड झाली आहे. तसेच, काही ठिकाणी संरचनात्मक धोकाही निर्माण झाला आहे. गडावर जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी, पिण्याच्या पाण्याची सोय आणि जागोजागी माहिती फलक उभारण्याची नितांत आवश्यकता आहे.
स्वराज्य आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढलेल्या छत्रपती संभाजीराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा वैभवशाली ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी धर्मवीर गडाचा तातडीने जीर्णोद्धार करण्याची मागणी शेवाळे यांनी केली आहे.