सातारा
(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटन स्थळ तसेच ऐतिहासिक वास्तू उभ्या केल्या आहेत. त्याची कीर्ती सात समुद्राकडे पोहचली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मुहूर्तावर सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सातारा तालुक्यातील लिंब परिसरातील बारा मोठ्यांच्या विहिरीची भेट घेऊन तेथील इतिहास जाणून घेतला. वास्तू कलेचा नमुना असलेल्या विहिरीच्या बाबत आश्चर्य व्यक्त केले.
सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या समवेत सातारा अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे , महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, सातारा उपविभागीय अधिकारी बारकुल व सातारा तहसीलदार नागेश गायकवाड, सातारा जावळी तहसीलदार हणमंत कोळेकर , संबंधित विभागातील मंडल अधिकारी, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातल्या लिंब गावात असलेली सुमारे तीनशे वर्ष जुनी ‘बारामोटेची विहीर’ हे एक असंच प्रसिद्ध ठिकाण. इ.स.वी.सन. १७१९ ते १७२४ या दरम्यान शाहू महाराजांची पत्नी वीरुबाई हिनं ही दगडी विहीर बांधल्याचं सांगितलं जातं. जवळपास १०० फूट खोल आणि ५० फुट रुंद असलेली ही विहीर गावकऱ्यांसाठी आजीवन पाण्याचा उत्तम स्रोत ठरली आहे. विहीर निर्माण करते वेळी ३३०० आंब्याची कलमं लावून इथे आमराईची निर्मिती करण्यात आली होती.
पेशव्यांच्या, शाहुंच्या अनेक खासगी बैठकी, निवांत क्षण यांना साक्ष असलेली ही विहीर प्रसिद्ध झाली, ती तिच्या भिंतीवर कोरलेल्या व्याल आणि शलभ शिल्पांमुळे हे बारा मोटेची विहीर प्रसिद्ध आहे .व्याल म्हणजे वाघाचे तोंड आणि सिंहाचं शरीर. ही शिल्पं राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक ठरतात.
विहीरीच्या दक्षिण दिशेला ४ हत्तींवर आरूढ झालेल्या वाघाचं शिल्प दक्षिणेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रदर्शित करते आणि उत्तरेकडे असलेली झेपावणारी व्याघ्र शिल्पं पुढच्या उत्तरेकडील मोहिमेचा संकेत देतात. अष्टकोनी विहीरीच्या प्रत्येक कोनात नागदेवतेची मूर्ती आहे. विहीरीतील खासे बैठकीत कमळ, हत्ती, गणपती, मारुती ही शुभ चिन्हं चितारली आहेत. या विहिरीच्या अवतीभवती असलेल्या आंब्याच्या झाडाच्या सावलीत सातारा जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी व तलाठ्यांनी भोजनाचाही आस्वाद घेतला. अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
—————————————————
फोटो — ऐतिहासिक बारा मोटे विहिरीची पाहणी करताना जिल्हाधिकारी संतोष पाटील (छाया- निनाद जगताप, सातारा)