मुंबई : महायुती सरकारच्या लाडका कंत्राटदार मित्र योजनेत मुंबईकरांच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी केली आहे. मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशातून कंत्राटदारांना मालामाल करून महायुती सरकारने भ्रष्टाचाराचे विक्रम केले आहेत. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम हे कंत्राटदारांच्या फायद्यासाठीच होते. वांद्रे पूर्वेतील नवपाडा आणि बेहराम पाड्यातील रस्ते काँक्रीटीकरणमध्येही कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या कंत्राटदार मित्रांचे खिसे भरण्यासाठी महाभ्रष्ट सरकारने घाईगडबडीत वांद्रे पूर्व येथील नवपाडा आणि बेहरामपाडा येथे निकृष्ट दर्जाचे रस्ते काँक्रीटीकरण केले. या भागात मलनिस्सारण वाहिनी अस्तित्वातच नाही, ती टाकल्या शिवाय रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे चुकीचे आहे, असे स्पष्ट निर्देश स्थानिक नागरिक आणि वॉर्ड ऑफिसने वारंवार दिले होते पण या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हा रस्ता तयार करण्यात आला. कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचा काँक्रिट रस्ता बनवला आणि मलनिस्सारण वाहिनीच बनवली नाही. आता या भागात मलनिस्सारण वाहिनी बनवण्यासाठी पुन्हा रस्ता खोदावा लागेल किंवा मायक्रो टनेलिंगसाठी कोट्यवधींचा खर्च करून मलनिस्सारण वाहिनी टाकावी लागेल. या घोटाळ्यात कंत्राटदारांनी आधीच कोट्यवधी रुपये लाटले आहेत. या रस्ते घोटाळ्याला जबाबदार असलेले अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच मलनिस्सारण वाहिनीचे काम तातडीने सुरू करून प्रकल्प नियोजनबद्ध राबवावा असेही खासदार गायकवाड म्हणाल्या.
एकनाथ शिंदे सरकारच्या काळात कंत्राटदार मित्रांसाठीच काढलेल्या ६०८० कोटी रुपयांच्या रस्ते काँक्रीटीकरण टेंडरमध्ये या कामांचाही समावेश होता. रस्ते क्राँक्रीटीकरणाचे टेंडर म्हणजे मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा रस्ते घोटाळा असल्याचे आधीच सांगितले होते. मुंबईकरांच्या हक्काच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी करून आपल्या कंत्राटदार मित्रांना मालामाल करण्यासाठीच हे टेंडर काढण्यात आले होते, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.