सातारा(अजित जगताप ) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये अनेकांनी इतिहास घडवला आता त्यामध्ये कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी चे सुपुत्र व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व व्यवस्थापक डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांचे चिरंजीव डॉक्टर युगंधर सरकाळे यांनी ए.आय. (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीसारख्या बिनभरवशाच्या क्षेत्रात आत्मविश्वासाने स्वतःची जागा निर्माण केली . दुष्काळी भागातील नगदी पीक म्हणून डाळिंबी कडे पाहिले जाते आज या डाळिंबीचे उत्पादनाने त्यांनी जगभरात सातारची डाळिंब पोहोचवण्याचा स्वप्न पूर्ण केले. सातारा जिल्हा कृषी अध्यक्ष सौ.भाग्यश्री फरांदे- पवार यांनी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केलेल्या शेतीला भेट देऊन कौतुक केले.
साताऱ्यातील युगंधरने व्ही.आय.टी. पुणे येथे ई.एन.टी.सी. मध्ये बी.टेक. केले. त्यानंतर २०१४ मध्ये अमेरिकेतील कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर इंजीनियरिंग मध्ये एम.एस. आणि २०१९ साली पीएचडी केली. या
सात वर्षात ए.आय. मध्ये सखोल रिसर्च करून त्याने ‘अनिश्चिततेमध्ये निर्णय कसे घ्यावेत?’ (डिसिजन मेकिंग अंडर अनसर्टनिटी) यावर संशोधन केले. अमेरिका, जर्मनी आणि आफ्रिका अशा तीन देशांसाठी त्याने एकूण ६ प्रोजेक्ट्स पूर्ण करून दिले. यु.एस. नेवी साठी बनवण्यात आलेल्या पूर्णपणे स्वयंचलित ड्रोन्समधील अल्गोरिदम डिझाईनिंग करण्याचे कौशल्यपूर्ण काम युगंधरने करून दिले. पीएचडी करण्यासाठी त्याला यू.एस. डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, (डी.ए.आर.पी.ए.; यू. एस. नेवी), जर्मन कंपनी रेडावीया, नॅशनल सायन्स फौंडेशन अशा अनेक एजन्सीज कडून फंडिंग मिळाले.
एनएसएफ एजन्सीच्या फंडिंग मधून भूकंप, वादळ, पूर, न्यूक्लिअर अटॅक अशा संकटानी उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे आयुष्य मार्गी लावण्यासाठी बनवलेल्या अल्गोरिदम्स साठी मेन ब्रेन हा युगंधरचा सकाळी यांनी केलेल्या अभ्यासाचे फलित आहे.
सर्व संधींना झुगारून डिसेंबर २०२० मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी युगंधर भारतात परत आला. आपल्याकडे असणारे ए.आय. चे स्किल्स वापरून भारतात यासाठी काय संधी उपलब्ध होऊ शकतात याचा शोध युगंधरने सुरू केला. त्यासाठी सातारा, पुणे हे कार्यक्षेत्र निश्चित केले. अमेरिकेतील संशोधनकाळात केलेल्या प्रोजेक्टच्या अनुभवावरून आपण डिजाईन केलेल्या अलगोरिदम्सच्या मागे असणारे ॲप्लिकेशन्स, मेथोडोलॉजी अशा गोष्टी इतर क्षेत्रासाठीही वापरू शकतो हे त्याच्या लक्षात आले.
या विचाराने युगंधरने आत्मसात केलेले ए.आय. टेक्नॉलॉजी बद्दलचे ज्ञान शेती व्यवसायामध्ये वापरण्याचा प्रयत्न डॉक्टर युगांधर सरकाळे यांनी केला. तो नवनवीन तंत्रज्ञान शिकू लागला. तज्ञांशी बोलू लागला. पीक लागवड आणि सिंचनापासून ते कीटक व्यवस्थापन आणि पर्यावरणातील बदलांचा प्रभाव कमी करण्यासाठी ए.आय. प्रणालीचा होणारा उपयोग त्याच्या लक्षात आला. सेंद्रिय शेतीवर त्याचा भर आहे.
वडिलांची शेतीची पार्श्वभूमी, त्यातून झालेल्या ओळखी आणि मिळवलेली माहिती गोळा करत युगंधरने स्वतःची टीम तयार केली आहे . बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रासोबत सातारा डीसीसी बँकेचा ऊस शेतीविषयक एक प्रोजेक्ट राबवला जात आहे. ‘मॅप माय क्रॉप’ आणि ‘फसल’ हे दोन ॲप वापरून ‘कृषक’ नावाचे ॲप विकसित केले आहे. या ॲपचा वापर जिल्हा मध्यवर्ती बँक करत आहे.
डॉ. युगंधरने आपल्या शेतामध्ये या प्रकारचे आय. ओ. टी. सेंसर बसवून संपूर्ण शेतात ए.आय. प्रणालीचा वापर केला आहे. त्याची शेती सर्कलवाडीतील निसर्गरम्य डोंगराळ भागात आहे. त्याच्याकडे इरिगेशन सिस्टीमही पूर्णपणे ए.आय. तंत्रज्ञानावर चालणारी सेन्सर बेस्ड, ऑटोमॅॅटेड अशी आहे. विशिष्ट झोनला किती पाणी द्यावे लागेल, त्यासाठी किती वेळ लागेल याचे प्रोग्रामिंग करून ठेवले जाते. पाणी देताना जोपर्यंत पूर्ण पाईप मध्ये एकसारखे प्रेशर येत नाही तोपर्यंत ड्रीपर उघडले जात नाहीत. त्यामुळे हजारो झाडांना अन्नद्रव्य, पाणी आणि खत समप्रमाणात पुरवले जाते .
सेंसरच्या साह्याने जमिनीतील आर्द्रता, तापमान, हवेचा दाब, हवेची दिशा अशा गोष्टी मोजल्या जातात. यातून पाण्याची, खतांची मोठ्या प्रमाणात बचत होऊन पिकांचे आरोग्य राखले जाते.
शेतात खत आणि पाणी वापराने मोठ्या प्रमाणात तणाचा प्रादुर्भाव वाढतो. हे तण पिकाच्या वाटणीचे खत, पाणी शोषून घेते. शिवाय तणावरील कीड पिकाला मारक ठरू शकते. हे सर्व रोखण्यासाठी युगंधरने डाळिंबाच्या संपूर्ण शेतात विडमॅटचा वापर केला आहे.
मार्केटचा विचार केला तर सध्यस्थितीत ड्रॅगनफ्रुट, अवाकाडो, केळी, डाळिंब या मालाला चांगला उठाव असण्याचा हा काळ आहे. तज्ञांशी चर्चा करत डॉ युगंधर राजेंद्र सरकाळे यांनी सत्कार सर्कलवाडीच्या आपल्या शेतात डाळिंब लागवड करण्याचे ठरवले. तेल्यासारख्या प्रचलित रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने रोपे बनवणाऱ्या तज्ञ अशा धावडे-पाटील यांच्याकडून चार हजार रोपे उपलब्ध केली.
पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, त्याचा कालावधी याचा विचार करता प्रत्येक प्लॉटसाठी तंत्रज्ञान बदलत जाणार आहे याची मनाशी खुणगट बांधली. शेती उंचावर असल्यामुळे तेथील प्रचंड वाऱ्याचा विचार करता प्रत्येक रोपाला बांबूचा आधार देणे गरजेचे वाटले. रोपांची वाढ तपासत, योग्य वेळी छाटणी आणि थीनिंग केले गेले. ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक खतांचा संतुलित वापर केला.
डोंगरातले प्रदूषण नसणारे नितळ पाणी, स्वच्छ सूर्यप्रकाश, भरपूर जैविक खते यातून रोपांची निकोप वाढ होऊ लागली. फलधारणेसाठी डोंगरात असणाऱ्या मधमाशांमुळे नैसर्गिकरित्या परागीकरण होईल किंवा मधमाशांच्या पेट्याही आणल्या जातील. मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून फळाच्या गुणवत्तेबरोबरच त्याच्या रंगरूपाचाही विचार होतो. त्यासाठी डाळिंबाच्या प्रत्येक फळाचे ऊन, पाऊस, किडीपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणारे बॅगिंग, क्रॉप कव्हरिंग केले जाते.
साधारण १८ ते२० महिन्यानंतर डाळिंबाचा पहिला बहार घेता येतो परंतु डॉक्टर युगांदर युगंधर यांनी डाळिंब बागेचा पहिला बहार दहाव्या महिन्यात घेत आहे. झाडाला ते फळ पेलण्यासाठी आवश्यक असणारी मंडपाची (स्टेजिंग) व्यवस्थाही त्याने आपल्या शेतात केली आहे. शेती व्यवसायातील त्याचे हे मोठे यश मानावे लागेल.
ए. आय. प्रणाली वापरून डाळिंब शेती करण्याबरोबरच युगंधर आपल्या शेतात इतर पिकेही घेत आहे.
पिकाची लागवड करताना ज्या रोपांची लागवड करायची ते कुठून आणायचे, त्याला हार्डन्ड म्हणजेच निरोगी आणि सशक्त कसे बनवायचे, इथपासून युगंधरचे बारीक लक्ष असते.
युगंधरच्या शेतात सध्या भगवा जातीचे डाळिंब, रेड जारवी/रेड डायमंड जातीचे पेरू, जॅपनीज 15 पपई, नामधारी ऑरेंज, अंबर आणि इंडस यलो याग्ना जातींचे झेंडू, कुंदन टरबूज, ब्लॅक सुप्रीमो आणि बाहुबली जातींचे कलिंगड, इंद्रा ढोबळी मिरची, माहीम जातीचे आले, सेंट व्हाईट शेवंती, अंजीर, स्ट्रॉबेरी ही पिके जोमाने वाढत आहेत.
यातील प्रत्येक पिकासाठी विशिष्ट आकाराचे बेड बनवणे, शेताच्या बांधावर इन्सेक्ट नेट लावणे, एखाद्या पिकासाठी क्रॉप कव्हर लावायचे की नाही, लावले तर कसे लावायचे यासाठी त्याने वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले आहे.
प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे व्हाट्सअप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुप मधील शेतकरी आणि तज्ञांची दर १५ दिवसांनी मीटिंग होते. अचानक उद्भवलेल्या अडीअडचणीला शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मीटिंग घेतली जाते. गेल्या १० महिन्यांपासून युगंधर सर्कलवाडीमध्ये असणारी स्वतःची आणि सोबत घेतलेल्या शेतकऱ्यांची अशी एकूण ३० एकरामध्ये ए.आय. तंत्रज्ञानाने शेती व्यवसाय राबवत आहे. बळवंत सरकाळे, जीवन फडतरे यांच्यासारखे प्रयोगशील शेतकऱ्यांना त्याने सोबत घेतले आहे.
१०० शेतकरी एकत्र येऊन ‘एग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनी’ स्थापन करू शकतात. आपल्या सातारा जिल्ह्यातील सर्कलवाडीच्या मातीत रमणारे डॉक्टर युगांधर राजेंद्र सरकाळे यांनी शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक संशोधनाच्या माध्यमातून संजीवनी आणलेली आहे. त्याचा निश्चित शेतकरी फायदा घेतील असा विश्वास प्रा .संध्या चौगुले, डॉ. राजेंद्र सरकाळे व शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब चव्हाण, अरे क्रांती संघटना व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
——— ———- ——– ——- ——- ———– —-
फोटो- सर्कलवाडी तालुका कोरेगाव येथे अत्याधुनिक डाळिंब पिकाची पाहणी करताना भाग्यश्री फरांदे- पवार व डॉक्टर युगंधर आणि डॉ राजेंद्र सरकाळे व शेतकरी (छाया- अजित जगताप सर्कलवाडी)