मुंबई : केंद्रात रामदास आठवले यांना एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्री पद देण्यात यावे अशी आक्रमक भूमिका रिपाइंच्या कार्यकर्त्यानी घेतली आहे. रामदास आठवले यांनी मोदींना कायम साथ दिली असून, आतापर्यंत एकच राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, महाराष्ट्रातही त्यांनी अशी मागणी लावून धरली आहे. मंत्री पदासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक असून, यात रामदास आठवले यांच्या बरोबरच, सुरेश बारसिंग यांचे नाव आघाडीवर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून केंद्रात सरकार आहे. 2014 पासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष हा भाजपसोबत आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची समाजकल्याण राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र 2014 आणि 2024 या दोन्ही टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्रीपदाचा भार सोपविण्यात आला आहे. मात्र एनडीएचा घटक पक्ष असलेला रिपाइंला केंद्रात कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळावे अशी रिपाइंच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे तसेच रिपाइंचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंग यांना केंद्रात राज्यमंत्रीपदावर नियुक्ती करावी असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात रिपाइंला एक मंत्रीपद, महामंडळ अध्यक्षपद मिळावे
राज्यातील जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे.त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे.रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असल्याने महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्री पद द्यावे तसेच काही 4 महामंडळाचे अध्यक्ष पदे,उपाध्यक्ष पदे व विधान परिषद सदस्यत्व द्यावे अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.