प्रतिनिधी : विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय आखाडा निर्माण झाला आहे. अनेक राजकीय नेते या पक्षातून दुसऱ्या पक्षात व दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात जात आहेत. जसजशी निवडणूक जवळ येत आहे. तसतसा प्रचार शिगेला पोहोचत आहे. धारावीतील वातावरण ही तसेच असले तरी गेली अनेक वर्ष धारावी मध्ये आपलं राजकीय भवितव्य सांभाळत सत्ता एक हाती ठेवणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार वर्षाताई गायकवाड यांना ही निवडणूक थोडीशी जड जात आहे. कारण त्यांच्या भगिनी डॉ.ज्योतीताई गायकवाड या महाविकास आघाडी तर्फे काँग्रेस पक्षाच्यावतीने आपले नशीब आजमावत आहेत. मात्र घराणेशाहीला विरोध अनेक ठिकाणी आढळून येत आहे. तसेच महायुतीचे उमेदवार राजेश खंदारे यांनी प्रचारात आघाडी घेतली नसती तरी बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार मनोहर रायबागे यांनी मात्र अनेक संघटनाचा पाठिंबा मिळवत आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत.
माटुंगा लेबर कॅम्प येथे काल प्रचारादरम्यान त्यांना शेतकरी कामगार पक्षाचे ऍड राजेंद्र कोरडे यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. कोरडे हे धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक असून धारावी बद्दल त्यांचा अभ्यास पाहता ते रायबागे यांना निवडून आणण्यास शंभर टक्के प्रयत्न करणार असा विश्वास स्थानिकांना वाटत आहे. त्यामुळे बसपाचे उमेदवार मनोहर रायबागे यांचा विजय निश्चित मानला जात असून भावी आमदार म्हणून जनता आता त्यांच्याकडे बघत आहे.
