खटाव (अजित जगताप) : स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा असलेल्या सातारा जिल्ह्यातील मौजे खातगुण ता खटाव या गावात एस. टी. थांबा मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे संवादिनीचे अध्यक्ष अगस्ती अरुण लावंड यांनी पाठपुरावा केला. त्यांनी खातगुणला एस.टी. थांबा देण्याबाबत संबंधितांना उचित सूचना दिल्या आहेत. यामुळे खातगुणच्या विद्यार्थी व आजारी रुग्ण / वृद्ध आणि भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

क वर्ग देवस्थान असलेल्या खातगुणमध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचात्तरीनंतरही साधी एस.टी. आलेली नाही. गावची लोकसंख्या सुमारे ४००० च्या आसपास आहे. गावात दवाखाने माध्यमिक शाळा, कॉलेजची व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थी व आजारी रुग्ण / वृद्ध यांना तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे खटाव, पुसेगाव, कोरेगाव, फलटण व्हाया साताऱ्याला जावे लागते. पण तिथे जाण्यासाठी गावाच्या बाहेर २ ते २.३० किमी मुख्य रस्त्यावर येऊन एस. टी. गाडीचे दर्शन होते. त्यानंतर प्रवास सुरू होतो.
याचा फटका विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या शिक्षणावर पडत आहे. शाळा, कॉलेजच्या हजेरीवर याचा परिणाम होत आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. रुग्ण व वृद्ध यांना खाजगी गाडी करून जावे लागते.
खातगुण गावात प्रसिद्ध राजेबागसार पीरसाहेबांचा दर्गा आहे. तिथे आजूबाजूच्या परिसरातून शेकडो भाविक येत असतात. पण ज्यांच्याकडे खाजगी गाड्या आहेत, तेच येऊ शकतात. गरीब भाविकांची प्रचंड गैरसोय होते. गाव तिथे एस. टी. हे आपलं ब्रीद आहे. पण खातगुण गावाने एस. टी. पाहिलीच नाही. पूर्वी रस्ते चांगले नाहीत. हे कारण होतं, पण आता रस्ते ठीक आहेत. मुख्य रस्तावरून गावात एस. टी. यायला जेमतेम २ मिनिट लागतात. अशी परिस्थिती श्री लावंड यांनी एस.टी. व्यवस्थापकीय संचालक यांना सांगितली.