मुंबई (रमेश औताडे) : भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून नवीन वेतन करार लागू आहे. आत्तापर्यंत द्विपक्षीय वेतन समितीच्या ७ मिटिंग झाल्या, परंतु कोणतीही सन्माननीय तडजोड न झाल्यामुळे नाईलाजाने २८ ऑगस्ट २०२४ पासून किंवा त्यानंतर केव्हाही बंदर व गोदी कामगार आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संपावर जातील, असा स्पष्ट इशारा अखिल भारतीय बंदर व गोदी कामगारांच्या पाचही मान्यताप्राप्त महासंघाच्या नेत्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

प्रमुख बंदरातील कामगार संघटनांनी १२ ऑगस्ट २०२४ रोजी पोर्ट प्रशासनाला संपाची नोटीस दिली आहे.
भारतातील प्रमुख बंदर व गोदी कामगार महासंघांच्या राष्ट्रीय समन्वय समितीची मिटिंग ७ आणि ८ ऑगस्ट २०२४ रोजी व्हीओसी पोर्ट, तुतीकोरीन येथे झाली. या राष्ट्रीय समन्वय समितीच्या बैठकीत एकमताने प्रमुख बंदरांच्या सर्व गोदी कामगार व पेन्शनर्स यांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी बेमुदत राष्ट्रव्यापी संप करण्याचा निर्णय घेण्यात आला.