मुंबई : अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन मोठ्या प्रकल्पांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. या संदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने निविदा देखील मागवल्या आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत भुयारी रस्ता बनवण्याचा एक प्रकल्प असून दुसरा प्रकल्प फाउंटन हॉटेल ते थेट भाईंदर पर्यंत उन्नत मार्ग बनवण्याचा आहे.

गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी बघायला मिळते. सध्या या ठिकाणी टू बाय टू रस्ता असून त्यावरील खड्डे आणि मध्येच येणारा घाट यामुळे वाहतूक कोंडी असते. यावर उपाय म्हणून थेट भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या भुयारी मार्गात दोन्ही दिशेला प्रत्येकी तीन अशा एकूण सहा मार्गिका असतील. यातील मुख्य भुयारी मार्ग हा साडेतीन किलोमीटरचा असेल. भुयारी रस्त्याची लांबी 5.5 किमी असेल. या प्रकल्पासाठी 41. 14 कोटींची निविदा काढण्यात आली आहे. दुसरीकडे फाउंटन हॉटेल ते भाईंदर हा रस्ता देखील नेहमीच वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट ठरतो. याठिकाणी फाउंटन हॉटेलपासून भाईंदरला जाण्यासाठी एक उन्नत मार्ग बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा रस्ता 9.8 किमी लांबीचा असेल तर यावर दोन्ही दिशेला चार चार मार्गिका असतील. यासाठी 28.48 कोटींची निविदा काढण्यात आली आहे. वर्सोवा ते भाईंदर हा कोस्टल रोड तसेच ठाणे शहरातील कोस्टल रोड प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर गायमुख ते भाईंदर पर्यंत वाढणारी वाहन संख्या लक्षात घेऊन हे दोन प्रकल्प मंजूर करण्यात आले असून पुढच्या चार ते पाच वर्षात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.