
प्रतिनिधी : विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे देण्यात येणारे यंदाचे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटेंसह धीरज वाटेकर,अक्षय मांडवकर आणि इतर पुरस्काराचे मानकरी आहेत. रोख रक्कम, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. पुरस्कार वितरण सोहळा येत्या २७ जुलै रोजी होणार असून होणार आहे ‘आजतक’ वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक सुधीर चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.सोहळ्याचे यंदा २३ वे वर्ष असून वर्षी पत्रकारिता आणि समाज माध्यम क्षेत्राशी निगडित आठ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आहे. देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार समिती सदस्य अश्विनी मयेकर (कार्यकारी संपादक – साप्ताहिक विवेक),.प्रसाद काथे (संपादक – जय महाराष्ट्र टीव्ही वाहिनी), ज्येष्ठ पत्रकार प्रणव भोंदे आणि सुधीर जोगळेकर (माजी निवासी संपादक – लोकसत्ता) यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली, अशी माहिती विश्व संवाद केंद्र, मुंबईचे मुख्य संपर्क अधिकारी डॉ. निशीथ के भांडारकर यांनी दिली.पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे, एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या रिपोर्टर प्रज्ञा पोवळे यांना गौरविण्यात येणार आहे. धीरज वाटेकर यांना कोकणचा इतिहास आणि संस्कृती, साहित्यिक चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण यासारख्या सामाजिक जागृती विषयांवर काम केल्याबद्दल तर मुंबई तरुण भारतचे अक्षय मांडवकर यांना महाराष्ट्रातील वन आणि वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण या विषयावरील वस्तुनिष्ठ बातम्या आणि व्हिडिओ रिपोर्टिंगसाठी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
फेसबुक आणि इतर समाज माध्यमातून सामाजिक आणि राजकीय विषयांवर सातत्याने लिखाण करणारे ओंकार दाभाडकर, भारतीय इतिहास, राजकारण, विविध सामाजिक समस्यांवर संशोधन करून त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर प्रसारित
करणारे गौरव ठाकूर, इन्स्टाग्रामवरील ‘भोजनकट्टा’ हँडलद्वारे समाजाच्या सामाजिक समस्या समाजासमोर आणणारे, मराठी लघुउद्योजकांना प्रोत्साहन देणारे सचिन गायकवाड यांनाही देवर्षी नारद पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठातील मराठी पत्रकारितेतील गुणवंत विद्यार्थिनी वनश्री राडये यांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
हा सोहळा २७ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता कीर्ती महाविद्यालय सभागृह, काशिनाथ धुरू रोड, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई येथे होणार आहे.