मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणासाठीही लवकरच मान्यता मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य शासनाचा इरादा बदललेला नाही आणि केंद्र शासनाचा देखील वेगळा विचार नाही. असे स्पष्टपणे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ केंद्र शासनाने विमानतळ बांधकामाला परवानगी देताना ‘ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ‘ अशा नावाने पूर्वी परवानगी दिली होती, त्यामध्ये नामविस्तार होऊन आता “लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे होईल. राज्य शासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसारच विमानतळास नाव देण्यात येईल‘, असा प्रतिसाद प्रधानमंत्री मोदी यांनी दिला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक सुरू होईल, तेव्हा ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ‘ अशीच अधिकृत उद्घोषणा निश्चितपणे होईल. या ‘ड्राय रन‘ कालावधीत विमान प्रवासी यांचे पुढील कालावधीचे आगाऊ बुकिंग नोंदवणे, तांत्रिक बाबींची सज्जता अशा स्वरूपाची कार्यवाही होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठीचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी संमत केला असून राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन केंद्र शासनाकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठविला आहे. केंद्र शासनाच्या स्तरावर अशा नामकरणासाठी निश्चित असे धोरण ठरविले जात असून नवीन धोरणानुसार विमानतळाचे नामकरण लवकरच होणार आहे.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी स्वागत करून प्रास्तविक केले. तसेच आमदार रवींद्र चव्हाण, लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार कपिल पाटील, खासदार सुरेश (बाळ्या) म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर व लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडली.
यावेळी आमदार महेश बालदी, माजी खासदार संजय पाटील, माजी खासदार संजीव नाईक, जगन्नाथ पाटील, राजू पाटील, सुभाष भोईर, जे. एम. म्हात्रे , जगदीश गायकवाड, दशरथ भगत, जे.डी. तांडेल यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
नामकरणासाठी सर्वपक्षीय एकमेव प्रस्ताव असून त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी देण्यात आले.