प्रतिनिधी : मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी जुहू गल्लीतील शेकडो कोटींच्या भूखंड घोटाळ्यावर भाजप नेते आशिष शेलार यांना थेट चर्चेसाठी खुले आव्हान दिले आहे. CTS क्रमांक २०७ या आरक्षित भूखंडाबाबत काँग्रेसकडे ठोस पुरावे असून, तथ्यहीन आरोप करण्याऐवजी वेळ व ठिकाण सांगा, मी चर्चेसाठी तयार आहे असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सरकारवर लाडक्या बिल्डरला वाचवण्यासाठी बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, या निर्णयामुळे पालिकेला केवळ जमिनीची मालकी गमवावी लागणार नाही तर बांधकाम क्षेत्रफळातही ₹२४० कोटींचे नुकसान होईल, असे सांगितले. रहिवाशांचे पुनर्वसनही धोक्यात आले असून, आधीच्या आश्रय योजनेखालील ट्रान्सकॉन कन्स्ट्रक्शनच्या कामावर पाणी फेरले असल्याचा ठपका गायकवाड यांनी ठेवला.
“भाजप नेते शेलार आणि अमित साटम मूळ मुद्द्यापासून लक्ष हटवण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत आहेत; पण मुंबईची जमीन, संपत्ती आणि भविष्यासोबत दिवसाढवळ्या दरोडेखोरी आम्ही सहन करणार नाही,” असे ठणकावून गायकवाड यांनी सरकारला लक्ष्य केले.