मुंबई(रमेश औताडे) : मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजना संथगतीने सुरू असून सारथी संस्थेची फेलोशिप योजना थांबली आहे. तसेच महाज्योती च्या माध्यमातून मिळणाऱ्या विद्यावेतनाच्या पार्श्वभूमीवर गोंधळ आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालक व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.
विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करावी, त्यांना शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात संधी मिळावी यासाठी राज्य सरकारतर्फे या योजना राबविण्यात येतात. मात्र, निधीअभावी आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे योजनांची अंमलबजावणी थांबली आहे. परिणामी, स्पर्धा परीक्षा, उच्चशिक्षण, संशोधन आदी क्षेत्रात जातीय आरक्षणावर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
विद्यार्थ्यांना वेळेवर मदत न मिळाल्याने अनेकांचे शिक्षण अधांतरी राहिले आहे. महाज्योतीकडून प्रतिसाद न मिळाल्याने असंख्य विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या असून, सरकारकडून स्पष्ट धोरण जाहीर करण्याची मागणी वाढू लागली आहे.
निधी व मंजुरीची प्रक्रिया सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल असे अधिकारी सांगत आहेत. परंतु कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने विद्यार्थ्यांचा संयम सुटू लागला आहे. पालक संघटनांनी याप्रश्नी राज्य सरकारकडे तातडीने लक्ष घालावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही दिला आहे.