मुंबई(रमेश औताडे) : महाराष्ट्रासह मुंबईत दहा दिवस चाललेला गणेशोत्सव शनिवारी भक्तीभावात आणि जल्लोषात संपन्न झाला. सकाळपासूनच मिरवणुकांची लगबग सुरू झाली. शहराचा मानाचा गणपती लालबागचा राजासह मुंबईतील हजारो बाप्पा ढोलताशांचा गजर, फुलांची उधळण, गुलालाच्या लहरी आणि फटाक्यांच्या दणदणाटात समुद्राकडे निघाले. लाखो भाविकांनी भाविकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.गिरगाव चौपाटी, दादर, जुहू, मार्वे, वर्सोवा आदी समुद्रकिनाऱ्यांवर विसर्जन सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. अनेक मंडळांनी कलात्मक मूर्तींसह सामाजिक संदेश दिला. त्यामुळे मिरवणुकीला वेगळीच रंगत आली.यंदा २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला उत्सवाची सुरुवात झाली होती. दहा दिवसांत राज्यभरातून लाखो भाविकांनी मुंबईत येऊन बाप्पाचे दर्शन घेतले. अंधेरीचा तेजस गजानन, चिंचपोकळीचा चिंतामणी, गिरगावचा गणपती, मुंबईचा राजा, लालबागचा राजा यांच्यासह अनेक मानाचे गणपती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस आणि महापालिकेने काटेकोर व्यवस्था केली होती. ३० हजारो पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. समुद्रकिनाऱ्यावर बचाव पथके, दंगल नियंत्रण पथक आणि आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज होते. वाहतुकीसाठी विशेष पर्यायी मार्ग आखण्यात आले होते.घरगुती मूर्ती पर्यावरणपूरक उपक्रमाचा भाग म्हणून अनेकांनी कृत्रिम तलावातही मूर्तींचे विसर्जन केले. गणेशोत्सवाची सांगता झाली असली तरी भाविकांच्या मनात आशेचीच हाक आहे. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” असा जयघोष करत भक्तांनी बाप्पाला निरोप दिला.
दहा दिवसांच्या गजाननाला भक्तांचा उत्साही निरोप
RELATED ARTICLES