मुंबई : भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान असणार आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मेट्रोचे जाळे यासारख्या महत्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावरच्या गतिमान असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
प्रशिक्षणाचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुक्तागिरी निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत सोबत संवाद साधत महाराष्ट्रातील विविध विकास कामे, महत्वाकांक्षी योजना याविषयी माहिती दिली.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, भारतीय विदेश सेवेतील योजना पटेल, प्रतिभा पारकर-राजाराम, परमिता त्रिपाठी, अंकन बॅनर्जी, स्मिता पंत, बिश्वदीप डे, सी. सुगंध राजाराम या शिष्टमंडळाचे समन्वयक यशदाचे उपमहासंचालक त्रिगुण कुलकर्णी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र देशाचे ग्रोथ सेंटर आहे. महाराष्ट्र पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करून राज्याचा औद्योगिक विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर असून अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग सारखे जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करून विकासाच्या महामार्गावर गतिमान प्रवास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण, पर्यटन विकास, गृहनिर्माण या क्षेत्रात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईत परवडणारी घरांची निर्मिती करून सामान्यांना त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करीत असल्याचे सांगत यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील हिवाळी गावातील शाळा आणि तेथील विद्यार्थी आणि शिक्षक याविषयी कौतुकाने माहिती दिली. या शाळेला आवर्जून भेट दिली पाहिजे, असे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.