मुंबई : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या (VSTF) पाचव्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉर्पोरेट कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम (CSR) शहरी भागापुरता मर्यादित न ठेवता दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये राबवावा, असे आवाहन केले. शासन व खासगी भागीदारांनी एकत्र येऊन ग्रामविकासाचे व्यापक परिवर्तन साधावे, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर, टाटा ग्रुपचे नोवेल टाटा, जेएसडब्ल्यूच्या संगीता जिंदाल, आयडीबीआयचे राकेश शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी जलसंधारण कामाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला तसेच छत्रपती संभाजीनगर उपक्रम, दर्जा व्यवस्थापन व वेअरहाऊस संदर्भातील करारांचे आदानप्रदान झाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, VSTFच्या पहिल्या टप्प्यात सकारात्मक परिणाम दिसून आले असून दुसऱ्या टप्प्यात स्थानिक मनुष्यबळ व संस्थात्मक संरचनेवर भर दिला जाईल. टाटा ग्रुपने सामाजिक विकासासाठी २०-२५ टक्के CSR निधी राखून ठेवला असून विदर्भ व इतर मागास भागात काम सुरू केले आहे. जिंदाल ग्रुप गडचिरोलीतील ५० गावांत काम करणार असून आयडीबीआय बँक पाच जिल्ह्यांतील १०४ गावांमध्ये उपक्रम राबवत आहे.
या बैठकीत मिशन महा कर्मयोगी उपक्रम सर्व जिल्ह्यांत राबवावा, ग्रामस्तरावरील अधिकारी-कर्मचार्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी शिफारस प्रवीणसिंह परदेशी यांनी केली.