प्रतिनिधी : इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटच्या वतीने नागपाडा येथील जे. जे. वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, हॉस्पिटल मोहम्मद अली रोड येथे नवजात बाळांचे आणि त्यांच्या पालकांचे स्वागत करण्यासाठी एक आगळीवेगळी आणि नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात आली.
या उपक्रमाअंतर्गत नवजात बाळांना आणि त्यांच्या पालकांना एक झाड, टॉवेल, टोपी आणि मिठाई यांचा समावेश असलेले खास बाळाचे स्वागत किट देण्यात आले.या उपक्रमात प्रत्येक नवजात बाळाला “हरित शुभेच्छा” देत त्यांच्या आयुष्याची सुरुवात एका झाडासोबत जोडली गेली. ‘एक बाळ – एक झाड’ ही कल्पना प्रत्यक्षात आणत समाजात पर्यावरण जागृती आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन या उद्दिष्टाने हे पाऊल
उचलण्यात आले.
कार्यक्रमावेळी इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटचे संयोजक के. रवि दादा, मंत्रालयाचे सहसचिव अशोक अत्राम, अभिनेते अली खान, कमल खान, राज्याचे माजी सहसचिव प्रीतम आठवले, समाजसेविका संगीता भाटिया आणि परब यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी के. रवि दादा यांनी पर्यावरण विषयावर मार्मिक भाष्य करत सांगितले की,”आपल्या आजूबाजूचं पर्यावरण दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. देशातील शास्त्रज्ञ वारंवार या संकटाबद्दल इशारे देत आहेत. तरीही झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणामुळे झाडांची बेसुमार तोड सुरू आहे. विशेषतः मुंबईसारख्या शहरांमध्ये झाडं तोडून मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. शहराचा विकास गरजेचा असला तरी त्याबरोबर निसर्गाचं नुकसान भविष्यात गंभीर परिणाम घडवू शकतं.”
“वृक्षतोडीमुळे तापमान वाढतं, हवामान असंतुलित होतं, आणि पावसाचे प्रमाण बदलतं – या सर्व गोष्टी भविष्यातील आपत्तींचं कारण बनू शकतात. म्हणूनच प्रत्येकाने झाडं लावण्याचा, त्यांचे संगोपन करण्याचा आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संकल्प केला पाहिजे. हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले.
या अभिनव उपक्रमाने फक्त बाळांचं स्वागतच केलं नाही, तर पर्यावरण रक्षणाचा एक महत्त्वाचा संदेशही दिला. ‘एक बाळ – एक झाड’ ही संकल्पना भविष्यातील जनगणनेत आणि आरोग्य सेवा उपक्रमांमध्ये देखील समाविष्ट केली जाऊ शकते, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमामुळे सामाजिक कार्य आणि पर्यावरण रक्षण यांचा संगम साधणाऱ्या कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले. नवजात बाळांसाठी झाडाचं रोप हे फक्त एक भेटवस्तू नव्हे, तर भविष्यातील शुद्ध हवेसाठीचा आणि हिरवळीसाठीचा आश्वासक आरंभ आहे.असे सिने अभिनेते अली खान यांनी सांगितले.
कार्यक्रमात ‘झाड लावा, झाड वाचवा’ हा संदेश देत नवजात बाळांच्या स्वागताचा उपक्रम एक सामाजिक व पर्यावरणीय भान जपणारा प्रेरणादायी पाऊल ठरला.