मुंबई : कोकणातील गणपती उत्सवासाठी एसटीने एकेरी गट आरक्षणावर केलेली ३०% भाडेवाढ अखेर रद्द करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आणि मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेऊन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, गणपती उत्सवासाठी यंदा मुंबई व उपनगरातील प्रवाशांसाठी तब्बल ५ हजार जादा एसटी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या गट आरक्षणांवर अमृतज्येष्ठ, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी सवलती लागू राहतील.
एकेरी गट आरक्षणांमुळे परतीच्या प्रवासात बसेस रिकाम्या आणाव्या लागतात, ज्यामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसतो. गेल्या वर्षी ४३३० बसेस कोकणात पाठवून परतीसाठी ११०४ बसेस रिकाम्या आणण्यात आल्या, यामुळे एसटीला तब्बल ११.६८ कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. यंदा ५ हजार बसेस सोडण्यात येणार असल्याने तोटा १३ ते १६ कोटींवर जाऊ शकतो.
तरीही राज्य शासनाने चाकरमान्यांच्या सोयीसाठी भाडेवाढ रद्द केली असून, खासगी बसेसच्या तुलनेत एसटीचे भाडे अत्यल्प आहे. त्यामुळे भविष्यात गरज पडल्यास थोडी दरवाढ झाली, तरी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सरनाईक यांनी केले.