मुंबई : मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार कसा बोकळला आहे व सत्ताधारी पक्षातील लोक अधिकाऱ्यांशी संगनमत मुंबईची कशी लुट करत आहेत याचा मुंबई काँग्रेसने पुन्हा पोलखोल केली आहे. देवनार एम ईस्ट वार्डातील एका पुनर्वसन प्रकल्पात बीएमसीने बिल्डरवर मेहरबानी करत सर्व नियमांन बदल देत मुंबईचा पैसा लुटला आहे. हा संपूर्ण घोटाळा १२५१ कोटी रुपयांचा असून या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा करावी व बिल्डरला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार कसा चालतो हे उघड करत खासदार वर्षा गायकवाड यांनी आणखी एका भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली, त्या म्हणाल्या की, देवनार एम ईस्ट वार्डात ३७ हजार ३६ चौरस मीटर क्षेत्रफळातील २४ हजार ८९१ चौरस मीटर भूखंडावर ३०० चौरस फुटांच्या एकूण २ हजार ६८ घरांच्या बांधकामासाठी २० ऑक्टोबर २०२२ रोजी निविदा काढण्यात आली. स्थायी समितीने २० डिसेंबर २०२२ रोजी AGSA Infra & Construction Pvt. Ltd. या ठेकेदाराच्या निविदेला मंजुरी दिली. दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रथम LOA जारी करण्यात आली. यासाठी ७०९.७७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले, ही किंमत मुळच्या ६८२ कोटीहुन जास्त आहे. त्यानंतर फेब्रुवारी ते जून २०२३ मध्ये ११० टक्के बँक हमीशिवाय ८० ते ८५ कोटी रुपये आगाऊ रक्कम देण्यात आली. हेसुद्धा CVC परिपत्रकाचे उल्लंघनच आहे. नंतर या प्रकल्पात बदल करून ७ जुलै २०२३ रोजी संपूर्ण ३७ हजार ३६ चौरस मीटर क्षेत्र समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली व सदनिकांची संख्या वाढवून ३३९८ करण्यात आली व खर्च १ हजार ४१ कोटींनी वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला. विकासाने पुन्हा DCPR नुसार FSI वाढवण्याची मागणी केली व ती पडताळणी न करताच स्विकारण्यात आली. दुसरा LOA टेंडरशिवाय काढला व एकूण प्रकल्प खर्चात ४२.२३ टक्के वाढ करण्यात आली, हे सुद्धा नियमांचे उल्लंघन करून केले गेले. प्रत्यक्ष काम सुरु नसताना नोव्हेंबर २०२३ रोजी १८.२८ कोटी रुपये देण्यात आले. जानेवारी २०२४ मध्ये पुन्हा १५.९६ कोटी रुपये बिल देण्यात आले. जून २०२४ मध्ये या प्रकल्पाचा कालावधी वाढवून ४० महिने करण्यात आला परंतु १७ महिन्यांच्या उशिराबद्दल बीएमसीने विकासकावर कोणतीही कारवाई केली नाही.
खा. गायकवाड पुढे म्हणाल्या की, देवनार प्रकल्पात निविदा व आर्थिक अनियमितता आढळून आलेली आहे. हे संपूर्ण प्रकरण पाहता काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत जसे की, प्रत्यक्ष काम न करता ₹86 कोटी का अदा करण्यात आले? ₹359 कोटींची खर्चवाढ नवीन टेंडरशिवाय का मंजूर केली? जे फ्लॅटचा भागच नाही अशा जागांसाठी (paver blocks, open space) पैसे का दिले? प्रकल्पाला “Turnkey” म्हणवूनही सतत व्याप्ती, खर्च, कालावधी का बदलत होते? CVC मार्गदर्शक असूनही 110% बँक हमी का काढली? यासाठी BMC मधील कोण जबाबदार आहे? हितसंबंध असूनही Master & Associates सल्लागार का कायम आहेत? याची उत्तरे मिळाली पाहिजेत असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
महायुती सरकार मस्त, मुंबईकर मात्र त्रस्त या अभियाना अंतर्गत महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारची पोल खोल करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आजच्या पत्रकार परिषदेसाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, मा. नगरसेवक अश्रफ आझमी, मोहसीन हैदर, शीतल म्हात्रे, डॉ. अजंता यादव, बब्बू खान, अर्शद आझमी, टुलिप मिरांडा, अखिलेश यादव इत्यादी उपस्थित होते.
देवनार प्रकल्पातील भ्रष्टाचार पाहता, ऑडीट व कायदेशीर चौकशी होईपर्यंत कोणतेही रक्कम दिली जाऊ नये. ८३ कोटी रुपयांसाठी ११० टक्के बँक हमीची अट पुन्हा लागू करावी, नवीन टेंडर काढावे. ठेकेदार AGSA Infra ला ब्लॅकलिस्टिंग करावे व या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.