सातारा(अजित जगताप) : सातारा तालुक्यातील आरफळ येथील आकारीपड नोंद असलेली गायरान जमीन सातारा जिल्हा प्रशासनाने शहिदांच्या वारसांना पाच एकर क्षेत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात आरफळ शेतकरी व ग्रामस्थ एकवटले असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सातारा येथील पत्रकार भवन मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी सातारा जिल्हाधिकारी यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा. अशी विनंती केली आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल असाही इशारा दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, आरफळ गावच्या हद्दीतील गट नंबर २७१,९४२,९८० या सरकारी आकारीपड म्हणून ११० एकर जमिनीची नोंद आहे . सदर जमिनीवर जिल्हा प्रशासनाचा ताबा असला तरी गेले अनेक पिढ्या या जमिनीवर गायरान म्हणून गावातील दूध देणाऱ्या व शेतीचा उपयुक्त ठरलेल्या पाळीव जनावरांचे क्षेत्र झाले आहे. एवढेच नव्हे तर सदर ठिकाणी निलगिरी व इतर विषयाची लागवड करून सामाजिक वनीकरणाच्या मार्फत ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्याबद्दल सातारा जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे. जलतज्ञांनीही या ठिकाणी श्रमदानातून बंधारे बांधले आहेत. डीप सीसीटी खोदून वृक्षारोपण केले असे बरेच इकोसिस्टीम तयार झाली आहे.
सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर, लांडोर, घुबड, बहिरी ससाणा, किंगफिशर, पोपट, बदक, रानकोंबड, चिमण्या, कावळे, बगळे, यासारख्या पक्षांचा वावर वाढलेला आहे. ससे, रान मांजर, कलिंदर, घोरपड ,साप, मुंगूस , यासारखे प्राणी सुद्धा अधिवास करत आहेत.
सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाल्यामुळे वनराई फुलली आहे. सदर जमिनीवरील सीसीटी बंधारे व वृक्ष लागवडीची सातबारा वर नोंद व्हावी यासाठी ग्रामसभेने ठराव सुद्धा केला आहे. देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या सर्वच जवानांबद्दल नितांत आदर आहे. परंतु, ग्रामस्थांना विचारात न घेता एखादा निर्णय लादत असेल तर त्याला विरोध आहे.
आरफळ गावाने पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी तसेच धरणग्रस्तांसाठी जमिनी दिलेले आहेत. या उलट गावातील मातंग समाजाला घरकुलासाठी जागा शिल्लक नाही. त्यांच्यासाठी भविष्यात जागेचा प्रश्न बिकट होणार आहे . आकारी पड जमीन गावातील मूळ जमीन मालकांना परत द्यावेत असा कायदा महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ मंजूर केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याचीही आठवण आरफळ ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत करून दिलेले आहे.
सीमेवर लढणाऱ्या सैनिकांबद्दल आदर, श्रद्धा, कृतज्ञता आहे परंतु, ज्या जमिनीतून कोणतेही पीक निघणार नाही. अशी जमीन डोंगराळ क्षेत्रामध्ये भविष्यात शेती करणे अशक्य आहे. त्यामुळे गट नंबर ९८० मधील नोंदी रद्द करून महाडिक कुटुंबीयांना इतर ठिकाणी शेती करण्यास लायक जमीन द्यावी .अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. देशाच्या सीमेवर लढणारे गावात अनेक माजी सैनिक आहेत. याचीही माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
या वेळेला सरपंच अर्चना शेखर भोसले, नरेंद्र पवार, सतिश साबळे, सुनील पवार, श्रीकांत पवार, मारुती पवार, प्रवीण पवार, संतोष माने, दत्तात्रय पवार, संदीप पवार, शेखर भोसले, मोहन पवार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_____________________________
फोटो– आरफळ ता सातारा येथील जमिनी बाबत माहिती देताना ग्रामस्थ (छाया– अजित जगताप, सातारा)