प्रतिनिधी : शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत दरवर्षी “वारी साक्षरतेची” उपक्रमाचे आयोजन केले जाते. देहू-पंढरपूर व आळंदी-पंढरपूर या दोन्ही पालखी मार्गांवर एक साक्षरता रथ शिक्षणाचा प्रचार प्रसार करत असतो. यावर्षी सुद्धा हा उपक्रम राबविण्यात आला.

या रथाच्या माध्यमातून पथनाट्य, बाहुली नाट्य, साक्षरता गीते, पपेट शो, साक्षरता घोषणा, घडीपत्रके, उपरणी, टोप्या, छत्र्यांचे वाटप अशा उपक्रमांद्वारे असाक्षर वारकऱ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाते. ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणीसह दिवेघाटात स्वयंसेवक शिक्षकांमार्फत प्रबोधनही झाले.
या उपक्रमाचा शुभारंभ शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, संचालक राहुल रेखावार, डॉ. महेश पालकर, कृष्णकुमार पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील अलका चौकात झाला.
“वारी साक्षरतेची हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे,” असे शिक्षण संचालनालयाचे भाऊसाहेब सरक यांनी सांगितले. नागसेन साबळे, करुणा साबळे, दीपक भुजबळ आदी स्वयंसेवक प्रचारकार्यात सक्रिय आहेत.