कास (अजित जगताप) : जावळी तालुक्यातील निसर्गरम्य धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्साही व अति उत्साही गर्दी झाली आहे. व्यावसायिकांचे फायदे होत असले तरी वजराई भांबवली धबधब्यावर सत्तर रुपयात अति उत्साही व व्यसनी युवकांच्या मृत्यूचा खेळ पाहण्यास मिळत आहे. यामुळे हौसेने आलेल्या पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. सुरक्षितेचा मेळ बसत नसल्याने आक्रीत घडू नये. यासाठी प्रार्थना केली जात आहे.
नैसर्गिक वरदान लाभलेल्या जावळी तालुक्यात रस्त्यावर चिखल व पाणी आणि घनदाट जंगलातून पायवाट, हिरवेगार डोंगर, छोटे-मोठे धबधबे पावसामुळे निर्माण झाले आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी, सोबत धुक्याची दुलई अनुभवास मिळत आहे. . पर्यटकांचा आनंद द्विगुणित होत आपला तरी अति उत्साही तरुणांमुळे वजराई भांबवली धबधबा अपघाताच्या प्रतीक्षेत आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वन विभागाच्या वतीने शुल्क आकारणी केली जात आहे. परंतु, बेधुंद व नशा पान करून आलेल्या तरुणांना आवर घालण्यासाठी समिती व वन विभागाला अपयश आले आहे.
सातारा पोलीस यंत्रणा इथपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सर्व कारभार अलविदा आहे. वनविभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात फक्त फलक लावला असला तरी दंडात्मक कारवाई होऊ शकली नाही. नियमाचे पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. परंतु अलीकडे अपघात घडल्यानंतर कर्तव्याची जाणीव करून दिली जाते. त्यामुळे अपघाताच्या प्रतीक्षेत वजराई भांबवली धबधबा आहे असा आता खेदाने नमूद करावे वाटत आहे.
पर्यटकांना राहण्यासाठी टेंट उपलब्ध असून बांबू कुटीचे काम झाले आहे. जून महिन्यातच वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समिती भांबवली यांच्याकडून धबधब्याच्या पर्यटनास प्रारंभ झाला आहे. प्रत्येक 70 रुपये पर्यटन शुल्क आकारणी करून खऱ्या अर्थाने मृत्यूचा खेळ सुरू झालेला आहे. अशी माहिती पर्यटक देत आहेत. वजराई भांबवली धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र व्हावे. यासाठी काही वर्षांपूर्वी स्थानिक भूमिपुत्र व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोरे यांनी प्रयत्न केले होते. पर्यटकांनी धबधब्यासह निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद लुटावा. तरुणाईने अतिउत्साहाला आवर घालावा. धोकादायक ठिकाणी प्रवेश करू नये. अशी वारंवार सूचना केली जाते पण त्याचे पालन होत नाही .पर्यटकांच्या सुख सोयीसाठी स्थानिक समिती व वनविभाग प्रयत्न करत आहेत. परंतु, नशा पण करून हुल्लडबाजी व दादागिरी करणाऱ्यांवर अंकुश व दंडात्मक कारवाई जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत हे असेच चालणार आहे. त्यामुळे पर्यटकांनी वनराई भांबवली धबधबा परिसरात सुधारणा होत नाही. तोपर्यंत मानसिक त्रास सहन करण्यासाठी जाऊ नये .अशी विनंती जेष्ठ नागरिकांनी केली आहे.
__________________________________________
चौकट– कास — ठोसेघर परिसरात वाहनांची तपासणी केली जाते. परंतु ,जागोजागी चकणा आणि युज अँड थ्रो च ग्लास उपलब्ध मोठ्या प्रमाणात होत आहेत.याची तपास यंत्रणेला जाणीव नाही. असे म्हणणे हे धाडसाचे ठरेल. कास पठारावर फुल उगवतात तशा पद्धतीने दारू व बिअरच्या रिकाम्या बाटल्या व प्लास्टिक ग्लास उगवतात का? असं अंतर्मुख करणारा प्रश्न एका पर्यटकांनी व्यक्त केला आहे.
______________________________
फोटो– निसर्ग रम्य वजराई भांबवली धबधबा दृश्य