सायगाव(अजित जगताप) : जावळी तालुक्यातील एकमुखी महिगाव या गावातील नवा पिढीने जुन्यांचा आदर्श घेऊन इतिहास घडवला आहे. गाव खात्याच्या जमिनीवर वृक्ष लागवड करून ज्योतिर्लिंग वनराई उभी करण्याचे महान काम केले आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीत या गावची ओळख आता महान गाव झाली आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…. याचा आदर्श घेऊन वनराई फुलवण्याचे महान काम जावली तालुक्यातील महिगाव करत आहे. ग्रामदैवत ज्योतिर्लिंग यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त सर्व ग्रामस्थ एकत्र आले होते. गाव खात्याच्या जमिनीमध्ये आता पूर्वीसारखे पाळीव जनावर चारणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. पशुधन सुद्धा घटल्यामुळे या जमिनीवर भविष्यात एखादा धनदांडगा डोळा ठेवून अतिक्रमण करून उद्योग उभा करेल. त्यापूर्वीच ग्रामस्थांनी विधायक व चांगल्या विचारांची लागवड करून खऱ्या अर्थाने गाव करील ते राव करणार नाही. हे दाखवून दिले आहे.
ज्या ठिकाणी पाळीव जनावरे गवत चरत होती. त्या जनावरांची संख्या कमी झाली आहे. पण वनराई फुलवण्याची जिद्द मात्र कायम आहे. सर्व लहान थोरांच्या सहकार्याने या ठिकाणी गाव खात्याच्या जमिनीवर ३२० वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. यामध्ये केशर आंबा, चिंच, फणस, जांभूळ, कदंब ,कवट, वड, पेरू, चिकू, लिंबू याच्यासह उत्पन्न देणाऱ्या फळांची ही लागवड करण्यात आलेली आहे. सध्या सात एकर पैकी तीन एकर क्षेत्रांमध्ये ही लागवड यशस्वी झालेली आहे.
वाई तालुक्यातील पसरणी या ठिकाणाहून ही रोप लोकवर्गणीतून आणण्यात आलेली आहे. काहींनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतीदिनानिमित्त दानधर्म करून कायमची प्रियजनांचे स्मरण जतन केले आहे. दर रविवारी वृक्ष लागवडीसाठी शेकडो हात राबत आहेत. जुन्यांचा आदर्श घेणाऱ्या महिगावकरांनी फार पूर्वी मुंबई या ठिकाणी सैतान चौकी परिसरात सामुदायिक गाळा घेतला होता. त्यामुळे अनेकांना मुंबईत राहणे सोपे झाले होते. आता नव पिढीला सावली व फळ मिळवून देण्यासाठी हेच हात झटत आहेत. गावातील शिक्षक, नोकरदार, शेतकरी, रंगारी व्यावसायिक, कारागीर, वायरमन, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी आणि सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते त्याचप्रमाणे मुंबई- पुणे- ठाणे- नवी मुंबई येथे राहणारे मूळचे ग्रामस्थ व नवरंग तरुण मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ही या गावातील ज्येष्ठांनी योगदान दिले आहे. आता राष्ट्रीय कर्तव्य म्हणून वृक्ष लागवड करण्यातही नव पिढी सरसावली असल्याने महिगाव एक महान गाव ठरले आहे.____________________
फोटो– महिगाव येथील गाव खात्याच्या जमिनीवर वृक्ष लागवड करताना नवी जुनी पिढी (छाया– अजित जगताप, सायगाव)
वृक्ष लागवड ध्यासाने महिगाव ठरले महान गाव…
RELATED ARTICLES