कराड(अजित जगताप) : सातारा, सांगली जिल्ह्यातील पालखी सोहळ्यांचा शासकीय मान-सन्मान यादीत समाविष्ट व्हावा. या मागणीसाठी वडगांव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज सोमवार दि. १६ पासून संत सखुबाई यांची नगरी असलेल्या कराड शहरातील तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. हिंदुत्ववादी विचाराच्या राज्य सरकारमध्ये वारकऱ्यांनावर ही वेळ आल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.
आषाढी एकादशी यात्रा २०२५ करिता मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली . याबाबत शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. गतवर्षी आषाढी एकादशी यात्रा सन २०२४ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणार्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार २०२३-२४ मध्ये विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडून एकूण १ हजार १०९ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. यावर्षीदेखील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याची मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमातून जाहिरात बाजी झाली. आता प्रत्यक्षात सातारा सांगली जिल्ह्यातील काही दिंड्यांना स्वखर्चानेच भक्ती करावी लागणार असल्याचे दिसत आहे.
वास्तविक पाहता दिंडी सोहळा चालकांना वाहन व इतर यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री व सध्याचे शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने ही योजना जाहीर केली आहे. त्यांच्या सातारा जिल्ह्यात अनेक वर्षांची मोठी परंपरा असणार्या जयराम स्वामी पालखी सोहळा तसेच श्री गाडगेनाथ पालखी सोहळा, श्री शेकोबादादा दिंडी सोहळा, ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दिंडी सोहळा, श्री सेवागिरी महाराज पालखी सोहळा या व इतर दिंडी सोहळ्यांचा मानाच्या यादीमध्ये समावेश झालेला नाही. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्याच मतदार संघावर अन्याय का ? असा आक्रमक सवाल महायुतीचे समर्थक करू लागलेले आहेत.
या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी श्री विठ्ठलस्वामी महाराज सोमवार दि. १६ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून कराड तहसिलदार कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करणार आहेत. तर इतर दिंडी सोहळ्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वारकरी सांप्रदायातील अनेक कार्यकर्ते आंदोलनस्थळी भजन करुन टाळ-मृदुंगाचा गजर करत हिंदुत्ववादी विचाराच्या राज्य शासनाचे लक्ष वेेधून घेणार आहेत.
दरम्यान महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा अनुदान यादी जाहीर केली. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर सोहळा (आळंदी), संत तुकाराम महाराज पालखी सोहळा (देहू), सोपानकाका सोहळा (सासवड), संत निवृत्तीनाथ महाराज सोहळा (त्र्यंबकेश्वर), संत मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताईनगर (जळगांव), संत एकनाथ महाराज पालखी सोहळा (पैठण), संत नामदेव महाराज सोहळा (पंढरपूर) या सोहळ्याबरोबर चालणार्या दिंड्यांचा समावेश होता. त्यानंतर नगरचे खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारावरुन संत निळोबाराय पालखी सोहळा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकाराने सासवड येथील चांगोटेश्वर पालखी सोहळा, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने कोंडनेपूर (अमरावती) येथील रुक्मिणीमाता पालखी सोहळ्याबरोबर चालणार्या दिंड्यांचा समावेश अनुदान यादीत करण्यात आला. सातारा, सांगली सह कोकणातून येणार्या दिंडी सोहळ्यांना अनुदान यादीमध्ये समावेश करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामीण विकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह मान्यवरांना निवेदन देण्यात येणार आहे.
_____________________________
फोटो ओळी :
दिंडी सोहळा सन्मान अनुदान मागणी संदर्भात मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देताना प.पू. विठ्ठलस्वामी महाराज व पत्रकार धनंजय क्षीरसागर, आनंदराव देवकर व इतर (छाया – निनाद जगताप)
दिंडी सोहळ्याच्या सन्मानासाठी कराडमध्ये आज टाळ मृदंगाच्या गजरात आंदोलन….
RELATED ARTICLES