मुंबई : आता परदेशी शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांना विदेशगमन करण्याची गरज भासणार नाही, कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत राज्य शासनाने पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत आशयपत्र (LOI) प्रदान करत भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई व नवी मुंबई येथे उभारण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
एज्युकेशन सिटी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच विदेशी विद्यापीठांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम ताज हॉटेल, मुंबई येथे पार पडला.
या उपक्रमांतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीन (स्कॉटलंड), युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यूके), युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया), इलीनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका), इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (इटली) या जागतिक दर्जाच्या पाच विद्यापीठांनी महाराष्ट्रात शिक्षण केंद्र उभारण्यास सहमती दर्शवली आहे.
ही विद्यापीठे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात स्थापन होणार असून त्याच परिसरात मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी सुद्धा विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे हा संपूर्ण परिसर शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक स्वतंत्र ओळख निर्माण करणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मुंबई ही आज वित्तीय, औद्योगिक आणि मनोरंजनाचे केंद्र आहे. आता ती ‘एज्युकेशनल सिटी’ म्हणूनही ओळखली जाईल. विकसित भारत 2047 या उद्दिष्टाच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.”
ते पुढे म्हणाले की, “भारतीय तरुणांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आता देशातच पूर्ण होणार आहे. भविष्यात अधिक विद्यापीठे या उपक्रमात सहभागी होतील. नुकताच वेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाल्याचेही त्यांनी जाहीर केले.”
पायाभूत सुविधांची उभारणी, आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आणि शिक्षण क्षेत्रात भारताचे नेतृत्व हे या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे.