प्रतिनिधी : आज सोमवारी सकाळी मुंबईतील दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान कसाऱ्याहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलमधून एकूण आठ प्रवासी खाली पडल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी आहेत. या अपघातामुळे रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं असून, रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आयसीएफ (ICF) टीमसोबत नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने काही प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करत होते. त्याचवेळी समोरून जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या स्पर्शाने प्रवाशांच्या बॅगा घासल्या गेल्याने आठ प्रवासी थेट खाली फेकले गेले. या भीषण घटनेत पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने मुंबईतील नॉन-एसी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार सुरू केला आहे. बैठकीत पुढील तीन महत्त्वाचे बदल सुचवण्यात आले:
- स्वयंचलित दरवाजांना लूव्हर्स – हवेचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी.
- छतावर व्हेंटिलेशन युनिट्स – बाहेरून ताजी हवा पंप करणारे.
- वेस्टिब्यूल्स – डब्यांमधून आतून चालता येणारी व्यवस्था, जेणेकरून गर्दीचा ताण कमी होईल.
ही नवी डिझाइन असलेली पहिली नॉन-एसी लोकल नोव्हेंबर २०२५ मध्ये तयार होणार असून, चाचणीअंती जानेवारी २०२६ पासून प्रवासी सेवेत दाखल होणार आहे.
दरम्यान, अपघातात जखमी झालेल्यांवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वेने या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या बाबींचा तपास सुरू आहे.