Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रसाताऱ्यातील वाढत्या गुन्हेगारी बाबत सुशिक्षित तरुण वर्ग चिंताग्रस्त....

साताऱ्यातील वाढत्या गुन्हेगारी बाबत सुशिक्षित तरुण वर्ग चिंताग्रस्त….

सातारा (अजित जगताप ) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहराची ओळख पेन्शनरचे गाव अशी होती. ती पुसण्याचे काम सध्या वाढत्या गुन्हेगारीने केले आहे. सक्षम पोलीस यंत्रणा आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा अन्वेषण विभाग व पोलीस ठाणे या ठिकाणी संधी मिळाल्यास गुन्हेगारांवर आळा बसू शकतो. पण तसे घडत नसल्याने तरुण वर्ग चिंताग्रस्त बनले आहेत. अनेक सराईत गुन्हेगार हे चांगल्या कुटुंबातील मुलांना गुन्हेगारी क्षेत्रात वळवण्यास प्रवृत्त करत आहेत. याबाबतही प्रबोधन होणे गरजेचे आहे. आज भुरटे गुन्हेगार कायदा मोडण्यातच धन्यता मानत आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व परिसरातील गुन्हेगारीचा उगम हा फ्लेक्स बोर्ड आणि वाढदिवसांनी होत असतो. त्यामुळे नेत्यांच्या हातून बर्थडे केक कापणे. ही एक अघोषित परंपरा झालेली आहे. एकदा का नामांकित गुन्हेगाराच्या सोबत फोटोसेशन झाले की गल्लीबोळातही छोटे-मोठे सरदार निर्माण होतात. आता सातारा शहरामध्ये असे अनेक सरदार परिसरात खुलेआम वावरत आहेत. सोबत झोपडपट्टी दादा, भुरटे आश्रयदाते आणि नेत्याचा गजर करणारे धोरण ठरवणारे काय बी कर्ते यांची अभद्र युती आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शस्त्र आणि रसद पुरवठा आणि त्यांच्या आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी हातभार लावला जात आहे. सुशिक्षित तरुणांना नोकरी व्यवसायासाठी सातारच्या बाहेर पडावे लागत आहे. याचा कधी विचार होणार? सोमवारी सकाळी सातारा बस स्थानकातील प्रवाशांची गर्दी बरेच काही सांगून जाते.
सातारा जिल्ह्यात अनाधिकृत दारू धंदा,जुगार, मटका, वाळू, हॉटेल – धाबा आणि जमीन खरेदी विक्रीची दलाली एवढ्या पुरतो मर्यादित होते. आता त्यामध्ये ठेकेदारांनी सुद्धा आपले साम्राज्य उभे केले आहे. नेत्यांपेक्षाही ठेकेदारांची कामे करणारे स्वयंघोषित ईश्वर निर्माण झालेले आहेत. त्यांचे रांजण भरावे. म्हणून दादा, भैय्या, आबा, तात्या, मामा, काका अशी पिलावळ सुद्धा नकळत का होईना या गुन्हेगारीला हातभार लावत आहे. कानून के हाथ लंबे होते है ! पण काही वेळेला हे हात आकसले गेले जात आहेत.एखाद्या निकृष्ट दर्जाचे काम केले तर त्याच्या दहशतीमुळे त्याबाबत कोणी बोलत नाही. पण सामान्यांचा त्याचा त्रास होतो. रात्रीच्या वेळी कास पठारावर जाणे अवघड झालेले आहे.

काही विचारवंत व साहित्यिक जागतिक दहशतवादाबद्दल परखडपणे आपल्या लेखणीतून मत मांडतात पण, स्थानिक गुंडा बाबत निवेदनावर साधी सही देण्यास सुद्धा कोणी तयार नसतं. हे सुद्धा वास्तव्य पुढे आलेले आहे. आणि पोलीस सुद्धा ते मान्य करतात.
सातारा शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी खूप मोठ्या सामाजिक संस्था व व्यक्ती कार्यरत आहेत. सक्षम पोलीस अधिकारी व कर्मचारी संधीची वाट पाहत आहेत. सातारा सुधारण्यासाठी त्यांच्या नियुक्ती होणे. हेच फक्त बाकी आहे.
सामाजिक स्वास्थ कायम राहावे. यासाठी विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जातात. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, व्यवसाय मार्गदर्शन, रोजगार मेळावा, अन्नदान ,सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक चर्चासत्र ,मनोरंजन अशा विविध ठिकाणी प्रामाणिक व होतकरू पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने सर्वांच्या मनामध्ये आदर युक्त स्थान निर्माण करत आहेत. ही बाब सुद्धा प्रकर्षाने जाणवली आहे.
मुळातच सातारा पोलिसांचा नावलौकिक निर्माण करणारे तात्कालीन पोलीस अधीक्षक मीरा बोरवणकर, अशोक कामटे, सुरेश खोपडे, एम.एम. प्रसन्ना, संदीप पाटील यांच्यासारखी मोजकीच नावे आजही घेतली जातात. त्यामध्ये त्यांचे कर्तव्य मोठे आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील गुन्हा अन्वेषण विभाग व स्थानिक पोलीस ठाणे येथील पोलीस दलाने दाखवलेल्या कर्तबगरीचा ही समावेश आहे .
अलीकडच्या काळात मर्जीतील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्ती व नेमणुका आणि त्यासाठी राजकीय नेत्यांची वशिलेबाजी हे चक्री जुगारापेक्षाही भयानक चक्र आहे. याबाबत कोणी उघडपणे बोलत नसले तरी त्याची चर्चा लपून राहत नाही. त्यामुळे तरुणाई सातारच्या शांततेसाठी सक्षम पोलीस यंत्रणा व सक्षम राज्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत आहे हे मात्र खरे…

_________________________________________
फोटो — पोलीस यंत्रणेचा प्रतिनिधी स्वरूपातील छायाचित्रे

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments