प्रतिनिधी : ओबीसी व भटके-विमुक्त विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात आणि शासनाच्या दुर्लक्षित धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी सोमवार, १० जून रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट येथे विद्यार्थी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली आहे. ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी-भटके-विमुक्त विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या परिषदेमध्ये राज्यातील विविध विद्यापीठांतील हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी व भटके-विमुक्त समाजाला दिलेली अनेक आश्वासने कागदावरच राहिल्याचा आरोप या परिषदेत करण्यात येणार आहे. विशेषतः प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र वसतिगृहांची घोषणा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, तसेच महाज्योती मार्फत अधिछात्रवृत्तीचे वितरण – या सर्व घोषणांची अंमलबजावणी अपूर्ण असल्याचा मुद्दा उपस्थित होणार आहे.
या परिषदेस ओबीसी नेते मा. प्रकाश अण्णा शेंडगे अध्यक्षस्थान भूषविणार असून, प्रा. टी.पी. मुंडे, चंद्रकात बावकर, जे.डी. तांडेल, दशरथदादा पाटील, लक्ष्मण गायकवाड, प्रा. नारायण भभोसले, पल्लवी रेणके यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
महाज्योतीच्या निधीत कपात करून सारथीला प्राधान्य, तसेच तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पीएचडी अधिछात्रवृत्तीप्रश्नी असलेली दिरंगाई यावर विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एल्गार परिषदेद्वारे ओबीसी-भटके-विमुक्त विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्णायक पातळीवर पोहोचवले जातील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.