Thursday, June 19, 2025
घरमहाराष्ट्रसामाजिक कार्यासाठी आयुष्य वेचणारे आयु. सुनील कांबळे यांचे दुःखद निधन

सामाजिक कार्यासाठी आयुष्य वेचणारे आयु. सुनील कांबळे यांचे दुःखद निधन

मुंबई : समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहणारे, माटुंगा लेबर कॅम्पमध्ये सदिच्छा सामाजिक विकास संस्था स्थापन करून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यातून तळागाळातील लोकांपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवणारे आयु. सुनील कांबळे यांचे रविवारी (८ जून २०२५) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते.

वयाच्या चौदाव्या वर्षी मुंबईत माटुंगा लेबर कॅम्प येथे मामाकडे आलेले सुनील कांबळे यांनी आपले शिक्षण मुंबईत पूर्ण केले. काही काळ मित्र भगवान कर्डक यांच्या घरी राहून दोघांनी मिळून विभागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरू केला. शिक्षणाचा प्रचार व प्रसार हे त्यांचे पहिले ध्येय ठरले.

त्यानंतर एम.एस.सी.बी. (MSCB) मध्ये कामाला लागल्यानंतर मिळणाऱ्या मानधनातून त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली. त्याचबरोबर त्यांनी सदिच्छा सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागात उत्कृष्ट सजावट करणाऱ्यांचा सन्मान, समाजरत्न पुरस्कार वितरण, कार्यरत सामाजिक संस्थांचा गौरव यासारख्या उपक्रमांमधून त्यांनी एक प्रेरणादायी कार्यपद्धती निर्माण केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावेत, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. त्यांच्या कार्याची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना वॉर्ड क्र. १८९ च्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पक्षाचे कार्य करत असताना त्यांनी आपल्या समाजातील प्रतिमेला कधीही तडा जाऊ दिला नाही. प्रेमळ, मनमिळावू स्वभावामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने वागत.

अलीकडेच त्यांनी आपला वाढदिवस वसई येथील मतिमंद मुलांच्या वसतीगृहात जाऊन साजरा केला. त्यांच्या मित्रपरिवाराला आणि सहकाऱ्यांना हा मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच माटुंगा लेबर कॅम्प परिसरात शोककळा पसरली. अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. आज एक सच्चा मित्र, मार्गदर्शक, आणि समाजसेवक हरपल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्यांच्या पार्थिवावर विटा (ता. खानापूर, जि. सांगली) येथे त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
समाजासाठी झटणाऱ्या या योद्ध्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.

आयु. सुनील कांबळे यांना धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली….

भिमराव धुळप

मो.९२२१११७६८४
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments