Thursday, June 5, 2025
घरमहाराष्ट्रधारावी मास्टर प्लॅनबाबत आरोप विरोधकांच्या अज्ञानातून; माजी खासदार राहुल शेवाळे यांची टीका.......

धारावी मास्टर प्लॅनबाबत आरोप विरोधकांच्या अज्ञानातून; माजी खासदार राहुल शेवाळे यांची टीका…. अपप्रचार,स्वार्थी राजकारणावर मात करून पुनर्विकासाची ग्वाही

मुंबई, ता. 3 : धारावी पुनर्विकासाच्या मास्टर प्लॅनबाबत सुरू असलेले आरोप हे अपुरी माहिती आणि विरोधकांच्या अज्ञानातून होत असल्याची टीका माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. एक्स समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये शेवाळे यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला असून यामागचे वास्तव सविस्तरपणे मांडले आहे. तसेच, स्वार्थी राजकारण, अपप्रचार यांना मागे टाकून धारावीकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

मास्टर प्लॅनवर आक्षेप घेत विरोधकांच्या शिष्टमंडळाने घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट आणि स्थानिक आमदार ज्योती गायकवाड यांनी केलेले आरोप याला राहुल शेवाळे यांनी समाज माध्यमातून प्रत्युत्तर दिले. विरोधकांनी संपूर्ण माहिती घेऊन मगच प्रतिक्रिया द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. राजकीय उदासीनतेमुळे, काँग्रेस सरकारच्या काळात रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे वेग येत असताना पुन्हा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात खोडा घालण्याचे काम विरोधी पक्षांकडून सुरू असल्याची टीका शेवाळे यांनी केली.

आपल्या विस्तृत विवेचनात शेवाळे यांनी म्हटले आहे की, मुळात मास्टर प्लान मध्ये केवळ पुनर्विकसित धारावीतील सार्वजनिक सुविधा, मोकळ्या जागा, बांधकामासाठी उपलब्ध जागा यांचे नियोजन ढोबळमानाने स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे यावर सूचना आणि हरकती घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. येत्या काळात जेव्हा धारावीचा विस्तृत विकास आराखडा नव्याने तयार होईल, त्यावेळी अशा प्रकाराच्या सूचना आणि हरकती यांचा नक्कीच विचार केला जाईल. तसेच सध्याच्या मास्टर प्लानमध्ये सद्यस्थितीतील FSI आणि TDR निकषांचा अंतर्भाव करण्यात आला असून मुख्य म्हणजे धारावीतील प्रत्येकाला पुनर्विकासात सामावून घेण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

माविआ सरकारच्या कार्यकाळात कांजूरची जागा ही मेट्रो कारशेडसाठी सुरक्षित ठरविण्यात आली होती आणि आता हजारो कष्टकऱ्यांची हक्काची घरे उभारण्यासाठी ही जागा अचानक असुरक्षित कशी काय झाली? म्हणजे सामान्य जनतेच्या हक्काच्या घरालाच तुमचा विरोध आहे का? असा सवालही राहुल शेवाळे यांनी उपस्थित केला.
तसेच, मिठागरांच्या जागेवर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याच्या योजना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री दिवंगत एकनाथजी गायकवाड यांच्या कार्यकाळातही प्रस्तावित होत्या. तसेच, मिठागारांच्या जागेवर लाभार्थ्यांना 300 चौरस फुटांचे घर देण्याचा शासन निर्णयही 2004 मध्ये तत्कालीन सरकारच्या काळात घेण्यात आला होता, याची आठवण शेवाळे यांनी विरोधकांना करून दिली.

विरोधकांनी कितीही आरोप, अपप्रचार केला तरीही धारावीकरांच्या जीवनाला कलाटणी देणारा पुनर्विकास प्रकल्प महायुती सरकार पूर्ण करणार असून या पुनर्विकासात प्रत्येकाला सामावून घेतले जाणार असल्याची ग्वाही देखील शेवाळे यांनी दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments