मुंबई(सदानंद खोपकर) : “कवी राजेश कोळंबकर यांची कविता ही माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारी आहे. आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो, ही जाणीव त्यांच्या कवितांमधून सतत जाणवते. विविध अंगांनी अनुभव मांडत त्यांनी मराठी साहित्यात एक महत्त्वाची भर घातली आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात कवी राजेश कोळंबकर यांच्या ‘ब्लॅक अँड ब्लू’ या आठव्या कविता संग्रहाचे प्रकाशन समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डांगळे यांनी भूषवले.
डांगळे पुढे म्हणाले, “१९६० नंतरचा साहित्य व सांस्कृतिक केंद्रबिंदू अभिजनाकडून बहुजनाकडे सरकला. समाज आपला चेहरा शोधत होता. याच काळात दलित साहित्य, लिट्ल मॅगझीन चळवळ, आणि नारायण सुर्वेंच्या कवितांमधून आलेली श्रमिकांची गर्जना — हे तीन प्रवाह प्रबळ झाले. ‘ब्लॅक अँड ब्लू’ हे शीर्षकही त्या वेदनेचे आणि वास्तवाचे प्रतीक आहे.”
चित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी साकारलेले संग्रहाचे मुखपृष्ठ आणि अंतर्गत चित्रेही या वास्तवदर्शी भावनांना सखोलपणे प्रतिबिंबित करतात, असे त्यांनी नमूद केले.
डांगळे म्हणाले, “या कवितांची भाषा सहज, संवादी आणि उपहासात्मक आहे. कवी कोळंबकर लढत आलेला आहे, संवेदनशील आहे, आणि दुःखाचे मूळ शोधणारा आहे. ‘पाऊल वाकडं पडलं तरी चालेल, पण ते उजवीकडे नसावं’ असे थेट सांगणारी ही कविता प्रतीक्रांतीची नांदी आहे. या कवितांमध्ये वर्तमानाचा वेध घेऊन भविष्यात डोकावण्याची ताकद आहे.”
त्यांनी खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या विज्ञानवादी भूमिकेची आठवण काढत सांगितले, “स्वतंत्र विचार असलेल्या साहित्यकृतींवर गदा येऊ नये यासाठी समाज सजग राहायला हवा. हा राष्ट्रीय प्रश्न आहे.”
कोळंबकर यांच्या कवितेतील काही ओळींना त्यांनी विशेष अधोरेखित केले :
“रात्रभर मी दु:ख भिजवले
सकाळी त्याला मोड आले”
तसेच संग्रहातील एक सकारात्मक ओळींनी भरलेली कविता डांगळे यांनी वाचून दाखवली :
“संपलं सारं म्हणू नये
कधीच काही संपत नाही
संपून जाईल सारं काही
असं कुठलं संकट नाही.”स्वतः कवी राजेश कोळंबकर यांनी यावेळी कवितांचे वाचन केले. ते म्हणाले, “स्वचिकित्सा गरजेचे आहे. माणसांनी सकारात्मक पद्धतीने जगावे, हा संदेशच माझ्या कवितांमधून जातो.”
या प्रसंगी प्रा. आनंद देवडेकर आणि योगिनी राऊळ यांनीही कोळंबकर यांच्या साहित्य व सामाजिक वाटचालीचा आढावा घेतला. सीमा निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रास्ताविक प्रदीप नाईक यांनी केले.