मुंबई : भाऊचा धक्का येथे स्थानिक मच्छिविक्रेत्या महिलांवर बांगलादेशी आणि रोहिंग्या समुदायातील लोकांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांनी त्वरित घटनास्थळी भेट देत पीडित महिलांची भेट घेतली.
महिला मच्छिविक्रेत्यांनी त्यांच्या पारंपरिक व्यवसायावर परकीय घटकांकडून होत असलेल्या अतिक्रमणाची आणि त्रासाची माहिती दिली. यावेळी मंत्री राणे यांनी स्थानिक मच्छीमार बांधवांना दिलासा देत, “मला इथे यावं लागणं हे आपल्या सर्वांचं अपयश आहे. या लोकांना कशाला परवानगी देता? हे लोक आपले कधीच होणार नाहीत,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
तसेच, स्थानिकांचा व्यवसाय बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, स्थानिकांचे हक्क आणि रोजगार सुरक्षित राहण्यासाठी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.
या घटनेने पुन्हा एकदा परराज्यीय आणि परदेशी घुसखोरांच्या उपस्थितीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.