नांदेड(प्रतिनिधी) : २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर धर्म विचारून हल्ला केला होता. याचा तीव्र निषेध करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड येथील भारतीय जनता पक्षाच्या ‘शंखनाद’ जाहीर सभेत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट सांगितले की, “गोळीचा जवाब गोळ्याने दिला जाईल” आणि “भारताची सीमा, सेना आणि जनता याला छेडणाऱ्याला सोडले जाणार नाही”.
शाह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये शेकडो अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला असून, यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची ठाम भूमिका अधोरेखित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देत पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघड करण्याचे आवाहन केले आहे.
शाह यांनी उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यावरही टीका केली आणि विचारले की, “किसकी बारात जा रही है?” असे विधान त्यांनी का केले होते? त्याचप्रमाणे, शरद पवार यांच्यावर टीका करत शाह म्हणाले की, अनेक वर्षे केंद्रात मंत्री असतानाही त्यांनी काही ठोस काम केले नाही. याउलट, मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याचा विश्वासही व्यक्त केला. त्यांनी भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या महाराष्ट्र भूमीचे महत्त्व अधोरेखित केले.
.