सातारा(अजित जगताप) : अवकाळी पावसाने सातारा जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाची लक्तरे वेशीवर टांगली आहे. त्याला आता जोडीला दरड कोसळत असल्याने नेमका जिल्हा प्रशासन व बांधकाम विभाग करते काय? असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. अजून मोसमी पाऊस सुरू झालेला नाही. त्यापूर्वीच केळघर, पसरणी आणि यवतेश्वर घाटात दगड कोसळण्याचे प्रमाण वाढू लागलेले आहे. यामुळे वाहतूक एकेरी करावी लागलेली आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक घाटामध्ये दरडी कोसळण्याचा प्रकार घडू नये. याबाबत कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. तरीही दरड कोसळण्याची सिलसिला थांबलेला नाही. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे. वाहतूक व्यवस्था निकामी झाली आहे .
कास पठारावर अनेक पर्यटक हे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे असतानाही हुल्लडबाजी आणि दारू पिऊन धिंगाणा घालणारावर अंकुश ठेवण्याऐवजी त्यांच्याकडून गुन्हा घडल्यानंतर बिदागी घेण्यातच धन्यता मानली जाते. हे सुद्धा उघड झाले आहे.
कास पुष्प पठार संवर्धन समिती आहे. परंतु या समितीमध्येच हॉटेल व्यवसायिक व उद्योजक असल्यामुळे स्थानिकांना पर्यटनाचा मनमुराद लाभ मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
सध्या कास पठारावर यवतेश्वर घाटातील दरडी कोसळत असल्याने सामान्यांना ये जा करण्यात अडचण येत आहे. केळघर- पसरणी घाटातही दरडी कोसळू लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग किती सज्ज झालेला आहे ? याची प्रात्यक्षिक वाहन चालक व पर्यटकांना दिसू लागले आहे. दरम्यान, सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व अभ्यासू पत्रकार आणि स्थानिक वाहन चालक तसेच आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनेबाबत संयुक्तरीत्या दौऱ्याची आखणी करावी. अशी मागणी होऊ लागलेली आहे. त्यामुळे नेमके उपाययोजना काय केली? यावर चांगला प्रकाशझोत टाकून वाहन चालक अडचणी सोडवण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
______________________
फोटो– साताऱ्यात अवकाळी पावसापूर्वी दरड कोसळत असल्याने वाहन चालक भयभीत..(छाया अजित जगताप, केळघर )