नवी मुंबई :
जागतिक स्तरावर दरवर्षी २४ मार्च हा दिवस क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जागतिक स्तरावर मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक असलेल्या क्षयरोगाकडे सर्वाच्या एकत्रित सहकार्याने लक्ष वेधण्यात येते. या दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवित क्षयरोगाविषयी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
क्षयरोगाच्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना यांचेमार्फत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दरवर्षी एक घोषवाक्य प्रसारित करण्यात येते. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने २४ मार्च २०२५ साठी “Yes! We Can End TB: Commit, Invest, Deliver” अर्थात “होय। आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतोः प्रतिज्ञा करा, तरतूद करा, सेवा द्या” – हे घोषवाक्य जारी केले आहे.
क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून याचा प्रसार श्वसनाव्दारे होतो. जगातील एकूण क्षयरुग्णांपैकी २५ टक्के क्षयरुग्ण हे भारतात आढळून येतात. भारतातील क्षयरुग्णांपैकी १० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळून येतात.
जागतिक स्तरावरील शाश्वत विकास ध्येयानुसार सन २०३० अखेर क्षयरोगाचे दूरिकरण करणे अपेक्षित आहे परंतु मा.पंतप्रधान महोदयांनी सन २०२५ अखेर देशातून क्षयरोगाचे दुरिकरण करण्याचे महत्त्वकांक्षी लक्ष्य ठेवलेले आहे. त्या अनुषंगाने देशात राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जाहीर घोषवाक्यानुसार राज्यातून क्षयरोग संपविण्यासाठी ३ प्रकारची कार्यवाही करण्यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे, त्यामध्ये – (1) सर्व भागीदारांनी क्षयरोग संपविण्यासाठी प्रतिज्ञा घेणे, (2) नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, क्षयरोगविषयक सेवा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी त्रुटी दूर करणे आणि प्रगतशील संशोधन करणे व त्यासाठी निधीची तरतूद करणे त्याचप्रमाणे (3) क्षयरुग्णांच्या फायद्यासाठी प्रतिज्ञेनुसार व केलेल्या तरतूदीनुसार त्यांना दर्जेदार सेवा देणे अशा 3 बाबी करणे महत्वाचे आहे.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोगविषयी व्यापक जनजागृती करण्यासाठी निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या अंतर्गत नमुंमपा शाळा क्र. 1 बेलापूर गाव येथील शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने क्षयरोग विषयक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीची सांगता माता बाल रुग्णालय, बेलापूर येथे करुन वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या उपस्थितीमध्ये रॅलीतील सहभागी शालेय विद्यार्थी, माता बाल रुग्णालय बेलापूर आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सी.बी.डी. येथिल अधिकारी / कर्मचारी तसेच राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या समवेत क्षयरोग मुक्त भारत घडविण्याची सामुहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.
नमुंमपा कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
नमुंमपा रुग्णालयांमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
वस्तीपातळीवर विशेषत्वाने झोपडपट्टी व अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात पथनाटय घेण्यात आले.
याव्यतिरिक्त जनसमुदाय सभा, रुग्ण सभा, कर्मचारी प्रशिक्षण इ. जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.
डी.वाय.पाटील वैदयकिय महाविदयालय व तेरणा वैदयकिय महाविदयालय या अंतर्गत पोस्टर्स स्पर्धा, कॉन्फरन्स, पथनाटय, रुग्णांचे आरोग्य शिक्षण इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
क्षयरोगाचे निर्मूलन करणेकरिता शासकिय व खाजगी आरोग्य सेवा यांनी एकत्रित काम करणे महत्वाचे आहे. यादृष्टीने खाजगी क्षेत्रातील सर्व रुग्णालये, क्लिनिक, लॅब्स इ. नी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची माहिती नमुंमपास कळविणे आवश्यक आहे. त्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका, खाजगी संस्था व नागरिक एकत्रित आल्यास नवी मुंबईतून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे शक्य आहे. तरी नवी मुंबई क्षयरोगमुक्त करणेकरिता खाजगी संस्था व नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.