दहिवडी : दुष्काळी माण तालुक्यामध्ये दुष्काळ नाहीसा करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले आहेत. त्याचाच भाग म्हणून मृदू व जलसंधारण विभागाने २०२३रोजी ढाकणी (तुपेशेत ) नवीन सिमेंट बंधारा कामाच्या कार्यारंभ आदेश दिला. परंतु, हे काम सुरू करण्यास शेजारील गावातील काही गावगुंडांनी विरोध केल्यामुळे प्रजासत्ताक दिनी दिनांक २६ जानेवारी रोजी दलित मातंग समाजातील शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. अशी माहिती सातारा जिल्हा परिषद माजी सदस्य व मानवी हक्क अभियानाचे उपाध्यक्ष दिलीप रामचंद्र तुपे यांनी दिली आहे.
ढाकणी (तुपेशेत) या ठिकाणी दलित समाजातील मातंगांसोबत धनगर मराठा वंजारी समाजाची शेत जमीन आहे. या शेत जमिनीला शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी जलसंधारण विभागाने सिमेंट बंधारा मंजूर केला. कार्यारंभ आदेशानुसार बंधारा बांधण्यासाठी संबंधित ठेकेदारांनी यंत्रणा पाठवली होती. त्या ठिकाणी काही गावगुंडांनी प्रचंड दहशत माजवली. सिमेंट बंधाऱ्याचे काम करू दिले नाही.
ढाकणी गावातील गरीब मागासवर्गीय शेतकऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ केली .हे सिमेंट बंधाऱ्याचे काम न झाल्यामुळे सुमारे २५ एकर शेती पाण्याविना पडून राहिली. अखेर काही शेतकऱ्यांनी ऊस ज्वारी बाजरी व फळबाग लागवडीसाठी पाण्याची स्वतः व्यवस्था करून शेती पिकाला जीवदान दिले. काम बंद पडल्यामुळे दलित शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी संबंधित शेतकरी आंदोलन करणार आहेत. त्यामुळे या परिसरात जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष वेधून हा प्रश्न सामंजसपणाने सोडवावा अशी मागणी होऊ लागलेली आहे.
ढाकणी (तुपेशेत) मंजूर बंधारा सुरू करणे बाबत शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
RELATED ARTICLES